सर्व समुदायांसह प्रत्येकाने देशाच्या घटनेसंबंधी कर्तव्य पार पाडून एक भारत, श्रेष्ठ भारत निर्माण करावयास हवा. भारताला पुन्हा विश्वगुरू गौरव प्राप्त करून देण्याचे ध्येय आपण सर्वांनी आपल्या उराशी बाळगले पाहिजे, असे उद्गार राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू आणि राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी काढले.
बेळगाव सुवर्ण विधानसौधच्या सभागृहामध्ये आज बुधवारी सकाळी आयोजित राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या 9 व्या दीक्षांत समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे यानात्याने ते बोलत होते. ज्ञान संपादन करणे हा शिक्षणाचा उद्देश असतो. शिक्षणामुळे आपल्या सर्वांगीण प्रगतीची द्वारे खुली होतात. नवनवे शोध लावण्यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वयंरोजगाराला प्रोत्साहन मिळून देशाची प्रगती होण्यामध्ये शैक्षणिक संस्थांचा महत्वाचा वाटा आहे असे सांगून स्वावलंबी बनण्यासाठी आणि स्वावलंबी भारत निर्मितीसाठी युवा पिढीने उच्चशिक्षित होणे गरजेचे आहे, असे राजपाल थावरचंद गेहलोत म्हणाले.
सरकारने देऊ केलेल्या 127 एकर जागेमध्ये राणी चन्नम्मा विद्यालयाच्या नूतन कॅम्पसची लवकरात लवकर उभारणी केली जाईल तसेच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही राज्यपाल गेहलोत यांनी आपल्या समयोचित भाषणात स्पष्ट केले.
सदर दीक्षांत समारंभामध्ये विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. एच. सुदर्शन, वादीराज बी. देशपांडे आदी तिघा मान्यवरांना राणी चन्नम्मा विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. त्याचप्रमाणे 86 जणांना डॉक्टरेट पदवी, 2749 जणांना स्नातकोत्तर पदवी, 35484 जणांना स्नातक पदवी तर 188 जणांना डिप्लोमा प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. याखेरीज शैक्षणिक अभ्यासक्रमातील सर्वोत्तम यशाबद्दल राज्यपालांच्या हस्ते 10 विद्यार्थी-विद्यार्थिनींना सुवर्णपदक बहाल करण्यात आली. तसेच 86 जणांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
या दिमाखदार दीक्षांत समारंभाप्रसंगी सहकुलगुरू आणि उच्च शिक्षण व माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण, राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. एम. रामचंद्र गौडा कुलसचिव प्रा. बसवराज पद्मशाली, प्रा. विरनगौडा बी. पाटील, वित्त अधिकारी प्रा. डी. एन. पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. त्याचप्रमाणे सदर समारंभास सिंडिकेट आणि शिक्षण परिषदेचे सदस्य, निमंत्रित पाहुणे, प्राध्यापक वर्ग, पालक तसेच विद्यार्थी -विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.