भारताने सन 1971 साली पाकिस्तानवर युद्धात मिळविलेल्या विजयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आज गुरुवारी शहरातील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे आयोजित ‘विजय दिवस’ या विशेष कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हजेरी लावली. त्या युद्धातील शहीद जवानांच्या स्मृतीला मुख्यमंत्र्यांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.

भारताने सन 1971 साली पाकिस्तानवर युद्धात मिळविलेल्या विजयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आज गुरुवारी शहरातील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे सुवर्णमय विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या 1971 चे युद्ध आजही जवानांना प्रेरणा देते. आपण आर्थिक आणि नैसर्गिक दृष्टीने जसे सक्षम आहोत. तसेच लष्करी दृष्टीने सुद्धा सक्षम आहोत. आजच्या स्वरणीम विजय दिवसात सहभागी होण्याची संधी मला मिळाल्याने मी भाग्यवान आहे, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. सीडीएस प्रमुख बिपिन रावत यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्टी असलेले कणखर व्यक्तिमत्व असे सांगितले. तसेच एमएलआयआरसी ही देशातील एक उत्तम इन्फंट्री असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमामध्ये परमवीर चक्र आणि अन्य शौर्य पदकांच्या सन्मानार्थ भरघोस वाढीव निधीची घोषणा केली. राज्य सरकारतर्फे परमवीर चक्रसाठी 25 लाखाचा निधी देण्यात येत होता तो दीड कोटी रुपये करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच महावीर चक्रसाठी 12 लाखांऐवजी 1 कोटी रु., अशोक चक्रसाठी 25 लाखांऐवजी दीड कोटी रु., कीर्ती चक्रसाठी 12 लाखाऐवज 1 कोटी रु., वीरचक्रसाठी 8 लाखाऐवजी 50 लाख रु., शौर्य चक्रसाठी 8 लाखाऐवजी 50 लाख रु., तर सेना मेडल व मेन इन डिस्पॅचसाठी असणाऱ्या 5 लाखामध्ये 15 लाख रुपयांची वाढ करण्यात आल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जाहीर केले. देशासाठी प्राणाचे बलिदान केलेल्या शहीद जवानांचे योगदान देश कधीही विसरणार नाही असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी प्रारंभी विजय दिवसानिमित्त मराठा सेंटर येथील युद्ध स्मारकाला प्रथम मेजर जनरल जे. व्ही. प्रकाश यांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. त्यानंतर अनुक्रमे राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण सुद, राज्याचे मुख्य सचिव पी. रविकुमार आणि गृहमंत्री आरग ज्ञानेन्द्र यांनी अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री बोम्मई यांनी युद्ध स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी राज्याच्या गृह खात्याचे सचिव रजनिश गोयल, बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके आदींसह वरिष्ठ लष्करी व पोलीस अधिकारी, लष्करी जवान आणि निमंत्रित उपस्थित होते. मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडंट ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा शानदार सोहळा पार पडला.