बेळगाव लाईव्ह : शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री रामदास कदम आणि प्रसिद्ध व्याख्यातेआणि शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते नितीन बानगुडे पाटील यांनी आज खानापूर (बेळगाव) न्यायालयात प्रत्यक्ष हजेरी लावली.
२६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापूर येथील ‘ताराराणी हायस्कूल’च्या मैदानावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित ‘युवा महामेळाव्या’त प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप या दोन्ही नेत्यांवर आहे. बेळगाव येथे चालणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला होता.
या महामेळाव्यातील भाषणांनंतर जमावाने पोलिसांवर हल्ला केला आणि सरकारी गाड्यांची मोडतोड केली, असा ठपका ठेवत खानापूर पोलिसांनी दोन्ही नेत्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ आणि १५३ (अ) अंतर्गत प्रक्षिभक भाषण केल्याचा ठपका ठेवत गुन्हे नोंदवले होते. प्रदीर्घ काळ चाललेल्या या खटल्यात आज आरोपींचे जबाब नोंदवून घेण्यात आले.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक वर्षे दोन्ही नेते कोर्टाच्या तारखेला हजर न राहिल्याने खानापूर न्यायालयाने रामदास कदम यांच्या खेड (महाराष्ट्र) येथील घरावर मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली होती. त्यानंतर तब्बल १६ वर्षांनी, म्हणजेच एप्रिल २०२२ मध्ये ते कोर्टात हजर झाले आणि त्यांना जामीन मंजूर झाला होता.
या सुनावणीत दोन्ही संशयित आरोपींचे जबाब नोंदवून घेतले आणि पुढील सुनावणीत दोन्ही पक्षांच्याव बाजूनी युक्तिवाद होणार आहे. पक्षातर्फे या खटल्याची पुढील सुनावणी २३ जुलै २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे. या प्रकरणात बेळगावचे वकील शामसुंदर पत्तार आणि हेमराज बेंचनावर हे कामकाज पाहात आहेत.




