Saturday, April 27, 2024

/

भारत बंद : पोलीस व आंदोलनकर्त्यात खडाजंगी

 belgaum

अन्यायकारक नवे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी आज सोमवारी सकाळी कित्तूर चन्नम्मा सर्कल येते शेतकऱ्यांनी छेडलेले आंदोलनाप्रसंगी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये खडाजंगी उडाल्याची घटना घडली. यावेळी पोलिसांनी शेतकरी नेत्यांसह सुमारे 50 -60 जणांना अटक करून दुपारी त्यांची मुक्तता केली.

केंद्र सरकारने अन्याय कारक कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देताना कळसा-भांडुरा होराट समिती, कर्नाटक राज्य रयत संघ आदी विविध शेतकरी संघटनांनी आज शहरात आंदोलन छेडले. कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे रस्त्यावर झोपण्याबरोबरच मानवी साखळी करून रास्तारोको करण्यात आला. त्यामुळे बराच काळ चन्नम्मा सर्कल येथील वाहतूक खोळंबल्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रहदारीस अडथळा न करता शांततेत आंदोलन करण्याची विनंती केली. तसेच रस्त्यावर लोळण घेणाऱ्या आंदोलनकर्त्यांना हटविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये एकच खडाजंगी उडाली. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला स्थानिक आम आदमी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील पाठिंबा देऊन आंदोलनात सहभाग घेतला आणि केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रयत संघटनेचे बेळगाव तालुकाध्यक्ष राजू मरवे यांनी केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांवर टीका करताना हे कायदे शेतकऱ्यांसाठी नसून अंबानी -अंदानी सक्षमीकरण व संरक्षण कायदा, अंबानी -अंदानी प्रोत्साहन व सोयी कायदा, अंबानी -अंदानी जीवनावश्यक साहित्य सुधारणा कायदा असे हे कायदे असल्याचे सांगितले.Farmers protest

 belgaum

नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी नसून व्यावसायिकांसाठी आहेत. तेंव्हा ते तात्काळ रद्द केले जावेत आणि देशातील शेतकऱ्यांना संरक्षण दिले जावे. गेल्या 26 सप्टेंबर 2020 पासून शेतकरी नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत. याची गांभीर्याने दखल घेऊन जारी केलेले काळे कृषी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांना सुखाने जगू द्यावे. अन्यथा जोपर्यंत सदर कायदे मागे घेतले जात नाही तोपर्यंत आमचे आंदोलन अशाप्रकारे अखंड सुरूच राहील, असा इशारा राजू मरवे यांनी दिला.

विविध शेतकरी संघटनांनी भारत बंदच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास चन्नम्मा सर्कल येथे आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर आंदोलन स्थळी आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकरी जमू लागले. यावेळी कडोली भागातून मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनासाठी येत असल्याची कुणकुण लागताच पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांसह सुमारे 50 -60 जणांना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार या सर्वांना एपीएमसी येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रा नजीकच्या महादेव मंदिराच्या ठिकाणी नेण्यात येऊन तेथे त्यांची चांगली बडदास्त ठेवण्यात आली आणि दुपारनंतर सर्वांची सुटका करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.