बेळगावच्या हुक्केरी तालुक्यातील बीरनोळी गावात केम्पागुड्डी टेकडीवरील मातीचा ढिगारा कोसळल्यामुळे सोमवारी (दि.1 मार्च) दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये हलप्पा गुरव (वय २४, रा. बिरनोळी, हुक्केरी) आणि यल्लाप्पा हरिजन (वय २२, रा. बिरनोळी, हुक्केरी) यांचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी सकाळी माती गोळा करण्याचे काम सुरु असताना अचानक टेकडीवरील मातीचा ढिगारा कोसळला. दरम्यान, दोन्ही युवक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले.
मातीखाली दबल्याने या दोन्ही युवकांचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच यमकनमर्डी पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले दोन्ही युवकांचे मृतदेह सापडले असून या युवकांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.