Sunday, April 28, 2024

/

बायपासचे काम रद्द न केल्यास संबंधितांचे पितळ उघडे पाडू -प्रकाश नायक

 belgaum

हलगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम तात्काळ रद्द करण्यात आले नाही तर गावोगावी, गल्लोगल्ली जनजागृती करून बायपासच्या कुटिल कारस्थाना मागे ज्यांचा हात आहे त्यांचे पितळ उघडे पाडले जाईल, असा इशारा शेतकरी नेते प्रकाश नायक यांनी आज बेळगाव लाईव्हशी बोलताना दिला.

वादग्रस्त मच्छे -हलगा बायपास रस्त्याची आपण फेर पाहणी करणार असून पीडित शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असले तरी बायपासच्या विरोधात आमचे आंदोलन सुरूच राहणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणानंतर आंदोलनाची पुढील ठरविली जाणार असल्याचे प्रकाश नायक यांनी सांगितले. मच्छे -हलगा बायपास रस्त्या संदर्भात शेतकऱ्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी काल गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती.

यावेळी शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आम्ही या रस्त्यासाठी एक इंचही जमीन देणार नाही असे ठणकावून सांगत आम्हाला पंजाबचे शेतकरी बनण्यास भाग पाडू नका, असा इशाराही दिला आहे. दडपशाही करून रस्त्याचे काम करण्याचा प्रयत्न केला जात असून हा न्यायालयाचा अवमान आहे तेव्हा यावर गांभीर्याने विचार केला जावा अन्यथा शेतकरी शांत बसणार नाहीत असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. मच्छे -हलगा बायपास रस्त्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे गेल्या तीन दिवसांपासून मच्छे शिवारात आंदोलन सुरू आहे.

 belgaum

सदर बायपास रस्त्याबाबत उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश काढलेला असतानादेखील दोन दिवसांपूर्वी मच्छे येथून रस्त्याचे काम करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कंत्राटदार पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले होते. त्यावेळी रस्त्याचे काम करण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला होता. तसेच कोणत्याही परिस्थितीत आम्ही रस्ता करायला देणार नाही अशी भूमिका घेऊन शेतकऱ्यांनी तेथेच ठाण मांडले.

पोलिसांच्या मदतीने रस्त्याचे काम हाती घेण्याचा प्रशासनाचा डाव हाणून पाडल्यानंतर शेतकऱ्यांनी मच्छे शिवारामध्ये तंबू ठोकून दिवस-रात्र आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी काल गुरुवारी बैठक बोलावून शेतकऱ्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला.

सदर बैठकीत शेतकऱ्यांनी बायपास रस्त्याला जोरदार विरोध दर्शविला. जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी तुमच्या काय मागण्या आहेत त्या सांगा मी त्या बाबत सरकारकडे पाठपुरावा करतो हवे असल्यास भरपाईची रक्कम वाढवून देऊ असे समजावले मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहात शेतकऱ्यांनी आम्हाला रक्कम नको तसेच इतर कोणतीही आमिषे दाखवू नका, असे ठामपणे सांगितले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही शेतकऱ्यांचा आदर करतो. त्यांना कोणताही त्रास होऊ नये अशी भूमिका पार पाडली जाईल, असे आश्वासन दिले. महत्त्वाचे म्हणजे मी स्वतः या रस्त्याची पाहणी करून तुमचे म्हणणे ऐकून सरकारकडे पाठपुरावा करेन, असे आश्वासनही जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिले आहे.

दरम्यान, बायपास रस्त्यासाठी हलगा -मच्छे दरम्यानच्या ज्या जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे ती जमीन तिबार पिकांची आहे. तेंव्हा हलगा -मच्छे ऐवजी कोंडुसकोप्प, धामणे, येरमाळ, राजहंसगड, देसुर ते खानापूर या पर्यायी मार्गाचा विचार केला जावा. कारण या परिसरातील जमिनी खडकाळ व माळवट आहेत. शिवाय रस्ता झाल्यास या भागातील लोकांचा विकास होणार आहे असे सांगून कोणत्याही परिस्थितीत नियोजित बायपास रस्त्याला आमचा विरोध असणार आहे, असे शेतकरी नेते प्रकाश नायक यांनी आज बेळगाव लाइव्हशी बोलताना सांगितले.

एका लोकप्रतिनिधीचा हट्ट पुरविण्यासाठी हलगा -मच्छे बायपासद्वारे शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय अशा हजारो लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. विकासाच्या नावावर विनाश नको असे आमचे मत आहे. जर हलगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम रद्द करण्यात आले नाही तर गावोगावी, गल्लोगल्ली जनजागृती करून बायपासच्या कुटिल कारस्थाना मागे ज्यांचा हात आहे त्यांचे पितळ उघडे पाडले जाईल, असेही नायक यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.