Wednesday, May 8, 2024

/

जायन्ट्सचा (मेन) रस्तारोको : केळकर बाग रस्त्याच्या कामाला युद्धपातळीवर प्रारंभ

 belgaum

धर्मवीर संभाजी चौक ते केळकर बागपर्यंतच्या रस्त्याचे काम तात्काळ केले जावे, या मागणीसाठी आज गुरुवारी सकाळी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) तर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित रस्त्याच्या कामाला युद्धपातळीवर प्रारंभ करण्यात आला आहे.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील विविध रस्त्यांची विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र यापैकी बहुतांश रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. धर्मवीर संभाजी चौक ते केळकर बाग दरम्यानच्या रस्त्याची देखील अशीच अवस्था झाली होती. गेल्या महिनाभरापासून या रस्त्यावर फक्त खडी टाकण्यात आल्यामुळे हा रस्ता पादचारी आणि दुचाकी सरांसाठी धोकादायक बनला होता. यासंदर्भात “बेळगांव लाईव्ह” ने सातत्याने आवाज उठविला होता. वृत्तपत्रांमधूनही यासंदर्भात बातम्या छापून आल्या होत्या. परंतु तरीदेखील स्मार्ट सिटीचे अधिकारी जागे होत नसल्यामुळे आज जायंट्स ग्रुप बेळगांव (मेन) तर्फे ध. संभाजी चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

जायंट्स ग्रुप बेळगांव (मेन) चे अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती सदस्य मोहन कारेकर, विभागीय संचालक मदन बामणे,
माजी अध्यक्ष सुनील भोसले, सचिव विजय बनसुर, खजिनदार लक्ष्मण शिंदे, विश्वास पवार, मोहन कारेकर, भाऊ किल्लेकर, सुनील मुरकुटे, अजित कोकणे, दिगंबर किल्लेकर, अशोक हलगेकर, आर. आय. पाटील, अविनाश पाटील, राजू बांदिवडेकर, राजू जैन आदींचा या रास्तारोको आंदोलनात सहभाग होता.

 belgaum

जायंट्सच्या रास्तारोको आंदोलनाची माहिती सध्या बेंगलोर येथे असणारे बेळगांव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांना मिळताच त्यांनी लागलीच बेळगांव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संबंधित अभियंत्याशी चर्चा करून केळकर बाग येथील रस्त्याचे काम तात्काळ हाती घेण्याची सूचना केली. त्यानुसार जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने या रस्त्यावर पसरून टाकण्यात आलेली धोकादायक खडी तातडीने काढून टाकण्यात आली. तसेच उद्या संध्याकाळी किंवा परवा दिवशीपर्यंत पेव्हर्स घालून या रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल, असे संबंधित कंत्राटदाराने बेळगांव लाइव्हला सांगितले.Giants

रास्तारोको आंदोलनानंतर बेळगांव लाइव्हशी बोलताना जायन्ट्सचे (मेन) अध्यक्ष संजय पाटील यांनी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील रस्त्यांचा विकास केला जात आहे ही चांगली बाब असली तरी बहुतांश रस्त्यांची कामं अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आलेली आहेत. त्यामुळे जनतेला मोठा मनस्ताप होत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे असे स्पष्ट केले. माजी अध्यक्ष सुनील भोसले यांनी येत्या पंधरा दिवसात फक्त केळकर बाग रस्ताच नव्हे तर शहरातील उर्वरित अर्धवट अवस्थेतील रस्त्यांची विकास कामे पूर्ण केली जावीत, अन्यथा जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन)तर्फे पुन्हा आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशारा दिला. मोहन कारेकर आणि विश्वास पवार यांनीदेखील शहरातील अर्धवट अवस्थेतील विकासकामे आणि रस्त्यांबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.~

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.