Monday, May 6, 2024

/

सुभेदार व्रजेशकुमार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 belgaum

शहरापासून अगदी मोजक्या अंतरावर असलेल्या गणेशपूर मार्गावरील खड्डेमय रस्त्यावर झालेल्या वाहन अपघातातील मराठा रेजिमेंट सेंटरचे सुभेदार व्रजेशकुमार कृष्णन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर सदाशिवनगर स्मशानभूमीत गुरुवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

गणेशपूर मार्गावर खड्ड्यांची संख्या वाढली असून संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी व्यापून गेला आहे. या रस्त्यावरून मार्गक्रमण करत असताना मराठा रेजिमेंटचे ४१ वर्षीय सुभेदार व्रजेशकुमार कृष्णन यांचा अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. दरम्यान त्यांना तातडीने लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

सुभेदार व्रजेशकुमार कृष्णन २४ वर्षांपासून लष्करात विविध विभागात सेवा बजावित होते. कर्नाटक, महाराष्ट्र यासह दिल्ली, जम्मू आणि काश्मीर येथे सेवा बजाविताना त्यांचा प्रामाणिकपणा आणि सचोटी पाहून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कौतुकास ते पात्र ठरले होते. सेवानिवृत्तीसाठी केवळ ४ वर्षेच शिल्लक राहिली होती. परंतु यादरम्यान बेळगावमधील खड्ड्यांनी त्यांचा जीव घेतला. २४ वर्षे सेवा बजावून अवघ्या ४१ व्या वर्षी निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. व्रजेशकुमार यांच्या पश्चात पत्नी आणि तीन लहान मुले असल्याची माहिती त्यांचे भाऊ राजेश यांनी दिली.

 belgaum

बेळगाव शहरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेबाबत सातत्याने प्रसारमाध्यमांवर बातम्या झळकत आहेत. निवेदनांचा ढीग पडत आहे. परंतु स्मार्ट सिटीमध्ये गुंतलेले अधिकारी शहराव्यतिरिक्त इतर ठिकाणी दुर्लक्ष करत आहेत. शहराला स्मार्ट करण्याच्या लगबगीत परिसरातील मूलभूत आणि पायाभूत सुविधांकडे शहर प्रशासन तसेच स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत आहे. गणेशपूर मार्गावर सैन्य दलाचे महत्वाचे कार्यालय आहे. शिवाय या ठिकाणी अनेक सैन्यातील अधिकारी वास्तव्यास आहेत.

हा रस्ता कॅंटोन्मेंट हद्दीत येतो. परंतु त्याठिकाणच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून कॅंटोन्मेंट प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. यासंबंधी अनेकवेळा कित्येक संघटना, रहिवाशांनी निवेदने दिली आहेत. परंतु त्याचा कोणताही फायदा झाला नाही. अजूनपर्यंत दुर्लक्षित असलेल्या या खड्डेमय रस्त्यानी एका जवानाचा बळी घेतला आहे. असे अजून किती बळी प्रशासनाला हवे आहेत? आणि यापेक्षा भयानक परिस्थिती झाल्यानंतर संबंधित प्रशासनाला जाग येणार आहे का? असा संतप्त सवाल जनता उपस्थित करत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.