कोरोना प्रादुर्भावामुळे शालेय शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होण्यास विलंब झाल्यामुळे यंदा इयत्ता दहावी आणि बारावीची वार्षिक परीक्षा येत्या मार्च व एप्रिल महिन्यात घेणे शक्य नसल्याचे मत परीक्षा मंडळाने व्यक्त केले आहे. परिणामी 2020 -21 या शैक्षणिक वर्षातील दहावी व बारावीची वार्षिक परीक्षा मे किंवा जून महिन्यात होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या प्रारंभी राज्यातील शाळा सुरू होतात. त्यामुळे शैक्षणिक वर्षाचे योग्यप्रकारे नियोजन करता येते. शिक्षण खात्याकडून देखील चांचणी परीक्षा सहामाही व वार्षिक परीक्षांचे वेळापत्रक शाळा सुरू झाल्यानंतर जाहीर केले जाते. त्यानुसार मार्च महिन्यात बारावी तर याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दहावीची वार्षिक परीक्षा घेतली जाते.
यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षांना सामोरे जाताना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळतो. तथापि यंदा कोरोना प्रादुर्भावाचा संकटामुळे अर्धे शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे तरी अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत. परिणामी शिक्षण खात्याने अभ्यासक्रमात 30 ते 40 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व परिस्थितीत परीक्षा घेणे शक्य नसल्याची जाणीव शिक्षण खात्याला झाली असून त्यामुळे महत्व एप्रिल महिन्यात परीक्षा घेणे शक्य नसल्याचे मत शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
मुलांच्या शैक्षणिक जीवनात दहावी आणि बारावीचे टप्पे हे अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे या परीक्षांमध्ये चांगले गुण मिळावेत याकडे प्रत्येक विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे लक्ष असते. मात्र यंदा शाळा वेळेत सुरू न झाल्यास याचा सर्वाधिक फटका दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना बसला आहे. दहावी आणि बारावी या बोर्डाच्या परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांना किमान 50 टक्के अभ्यासक्रम शिकवला तरच विद्यार्थी चांगल्या प्रकारे परीक्षा देऊ शकतात अन्यथा विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचण होऊ शकते. यावेळी तर अर्ध्याहून अधिक शैक्षणिक वर्ष उलटले तरी शाळा सुरू झालेल्या नसल्यामुळे सदर परीक्षा मार्च एप्रिल रोजी मे किंवा जून महिन्यात घ्याव्या लागणार आहेत.
दरम्यान, सध्या शिक्षण खात्याकडून शालेय शैक्षणिक वर्ष लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. अद्यापही वेळ गेलेली नाही येत्या कांही दिवसात शाळा सुरू झाल्या तर परीक्षा वेळेत घेता येतील, अन्यथा परीक्षांना विलंब होऊ शकतो. कोरोनाचे संकट किती दिवसात दूर होणार यावर बरेच कांही अवलंबून असल्याचे मत शिक्षणाधिकारी अण्णाप्पा पॅटी यांनी व्यक्त केले आहे.