Saturday, April 20, 2024

/

आपण सर्वजण टाळू शकतो 17 चा भावी खतरा!

 belgaum

जगभरासह आपल्या देशात थैमान घालणाऱ्या प्राणघातक कोरोना विषाणूने आता बेळगाव बेळगाव जिल्ह्यात देखील झपाट्याने आपले पाय पसरवण्यास सुरुवात केली असली तरी अजूनही वेळ गेलेली नाही. जिल्ह्यातील तबलीगी जमातीच्या 7 जणांकडून पसरलेल्या कोरोनाने आतापर्यंत 17 जणांना आपल्या विळख्यात घेऊन पुढील खतऱ्याची अर्थात धोक्याची जाणीव करून दिली आहे. तथापि बेळगाव शहरासह जिल्ह्यातील जनतेने मनावर घेतल्यास हा आकडा पुन्हा शून्यावर नेऊन ठेवता येऊ शकतो.

प्राणघातक कोरोना विषाणुने देशभरात थैमान घालण्याबरोबरच आता बेळगाव जिल्ह्यात देखील हळूहळू आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे. खरेतर प्रारंभी राज्यात अन्यत्र कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असताना बेळगाव जिल्ह्यात मात्र एकही रुग्ण आढळून न आल्यामुळे दिलासादायक वातावरण होते. तथापि दिल्ली निजामुद्दीन येथील तबलीग मरकज धर्म सभेला जाऊन आलेल्या तबलीगी समाजाच्या कांही लोकांनी आपली ओळख दडवून ठेवल्यामुळे आपल्याला मिळालेला दिलासा खोटा होता हे प्रशासन आणि आरोग्य खात्याच्या उशिरा लक्षात आले. जेव्हा जिल्ह्यातील तबलीगी समाजाच्या 7 जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले.

दरम्यान, सदर सात रुग्ण आढळून येईपर्यंत बराच कालावधी उलटून गेल्यामुळे संबंधित कोरोनाग्रस्तांकडून आधीच कोरोनाचा अन्य लोकांना प्रादुर्भाव झालेला होता. परिणामी प्रारंभी तबलीगी जमातीचे तीन जण कोरोना बाधित आढळून आले. त्यानंतर हळूहळू जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत गेली. काल रविवारी दुपारी त्यामध्ये दोघांची आणि आज सोमवारी दुपारपर्यंत आणखी तिघांची भर पडल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 17 झाली आहे.

राज्यातील कांही अन्य जिल्ह्यांच्या तुलनेने बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या तशी फार नाही. तेंव्हा जर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील लोकांनी मनावर घेतले तर कोरोना विषाणूची प्राणघातक साखळी तोडून आपण जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडा पुन्हा शून्यावर नेऊन ठेवू शकतो. यासाठी राज्य शासनासह आरोग्य खात्याने जाहीर केलेल्या प्रतिबंधात्मक उपायोजना आणि सूचनांचे काटेकोर पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा सतराचे सतराशेहे होण्यास वेळ लागणार नाही. कोरोना विषाणू आणि त्यांचा प्रादुर्भाव मानवी जीवांसाठी किती जहाल व प्राणघातक आहे हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. इटली, फ्रान्स, अमेरिका आदींसारख्या प्रगत देशांना कोरोनाचा जीवघेणा झंझावात रोखता आलेला नाही. या देशांनी कोरोनासमोर अक्षरशः हात टेकले आहेत. प्रारंभीच्या काळात कोरोना प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष करण्याच्या चुकीचे प्रायश्चित आज हे देश घेत आहेत.

जगातील या प्रगत देशांकडून धडा घेऊन आपण सर्वांनी आतापासून सावधगिरी बाळगली पाहिजे. प्रत्येकाने सर्वात पहिली गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे घराबाहेर पडायचे नाही. सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतराचे भान ठेवावे. सर्दी, खोकला ताप आदी लक्षणे दिसत असल्यास घरगुती उपाय करत न बसता आपल्या डॉक्टरांकडून प्रथम वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. परदेशातून अथवा परगावातून आलेल्यांनी लागलीस घराबाहेर न पडता किमान 14 दिवस होम काॅरन्टाईन अर्थात घरातच राहावे. तसेच परदेशातून आलेल्यांनी आपण भारतात आपल्या घरी आल्याची माहिती नजीकच्या सरकारी रुग्णालयाला अथवा आरोग्य खात्याच्या कंट्रोल रूमला द्यावी. सार्वजनिक ठिकाणी एखादी काॅरन्टाईन शिक्का असलेली व्यक्ती आढळून आल्यास त्याबाबतची माहिती त्वरित नजीकच्या पोलिस स्थानक किंवा सरकारी रुग्णालयाला द्यावी. बेळगाव शहरासह जिल्ह्यातील जनतेने या सूचनांसह शासन व आरोग्य खात्याने दिलेल्या अन्य सूचनांची काटेकोर अंमलबजावणी केल्यास कोरोना विषाणू जिल्ह्यातून हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही हे निश्चित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.