बेळगाव लाईव्ह : कर्नाटकातील साखर उद्योगात बेळगाव जिल्ह्याचे वर्चस्व आणखी मजबूत होण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारकडे सादर झालेल्या 42 नवीन साखर कारखान्यांच्या प्रस्तावांपैकी तब्बल 13 प्रस्ताव हे एकट्या बेळगाव जिल्ह्यातील आहेत.
सध्या कर्नाटकमध्ये 81 साखर कारखाने कार्यरत असून, त्यापैकी 29 कारखाने एकट्या बेळगाव जिल्ह्यात आहेत. त्यामुळे सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून बेळगावची ओळख अधिक बळकट झाली आहे.
जिल्ह्यातील भरघोस ऊस उत्पादन, कृष्णा नदी खोऱ्यातील सिंचन व्यवस्था, सहकारी आणि खासगी साखर उद्योगाचे मजबूत जाळे, तसेच इथेनॉल उत्पादन आणि सहवीजनिर्मिती (Cogeneration) प्रकल्पांमुळे या क्षेत्रात गुंतवणूक वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
याशिवाय महाराष्ट्राच्या सीमेलगतचे भौगोलिक स्थान, उत्तम रस्ते व रेल्वे वाहतूक, शेजारच्या भागातून ऊस उपलब्ध होण्याची सुविधा, तसेच डिस्टिलरी, इथेनॉल प्रकल्प, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि औद्योगिक पायाभूत सुविधा यामुळे नवीन उद्योगांना बेळगाव अधिक आकर्षक ठरत आहे.
प्रस्तावित साखर कारखाने रामदुर्ग, बैलहोंगल, कित्तूर, सौंदत्ती, बेळगाव, गोकाक, अथणी, रायबाग आणि खानापूर तालुक्यांमध्ये विविध खासगी कंपन्यांकडून उभारले जाणार आहेत.
मात्र, तज्ज्ञांनी या विस्ताराबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. साखर कारखान्यांची संख्या झपाट्याने वाढल्यास ऊसासाठी तीव्र स्पर्धा निर्माण होऊ शकते. तसेच जलस्रोतांवर अतिरिक्त ताण आणि पर्यावरणीय परिणामही वाढू शकतात. त्यामुळे साखर उद्योगाचा विस्तार दीर्घकालीन शाश्वततेचा विचार करूनच करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.





