Friday, March 29, 2024

/

9 वर्षीय बालिकेचा मृत्यू: बीम्सच्या डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

 belgaum

बीम्स जिल्हा रुग्णालयामध्ये साध्या टॉन्सिल्स शस्त्रक्रियेसाठी दाखल केलेल्या एका 9 वर्षीय बालिकेचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि प्रमाणाबाहेर भूल दिल्याने झाला असल्याचा खळबळजनक आरोप जीवनमुखी फाउंडेशनने केला आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

श्रद्धा परशुराम मावरकर (वय 9 वर्षे) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. बीम्स जिल्हा रुग्णालयांमध्ये गेल्या 20 डिसेंबर रोजी तिला टॉन्सिल्सच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर सदर बालिका दोन दिवस कोमात गेली आणि तिला हृदयविकाराचा झटकाही आला. तथापि आपली चूक झाकण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने बालिकेला अधिक उपचारासाठी अन्यत्र हलविण्याएवजी रुग्णालयातच ठेवून घेतले आणि अगदी अखेरच्या क्षणी तिला केएलई रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. परिणामी गेल्या सोमवारी रात्री उशिरा श्रद्धा मावळकर तिचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला, असे जीवनमुखी फाउंडेशनचे प्रमुख किरणकुमार पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

या घटनेच्या निषेधार्थ फाऊंडेशनच्या सदस्यांनी मंगळवारी बीम्स रुग्णालयासमोर आंदोलन छेडून निदर्शने केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. काझी, बीम्सचे संचालक डाॅ. विनय दास्तीकोप्प आणि भूलतज्ञ डॉ. श्रीकांत यांना श्रद्धाच्या मृत्यूबद्दल दोषी ठरवत या हलगर्जीपणात सहभागी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली.

 belgaum

साध्या टॉन्सिल्सच्या शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटर कडे घेऊन जात असताना श्रद्धा चांगली धडधाकट होती. मात्र दुर्दैवाने डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिला हे जग सोडावे लागले असे सांगून किरण कुमार पाटील यांनी याप्रकरणी आपण वरिष्ठ पातळीवर दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.