बेळगाव शहरात स्मार्ट सिटीच्या नावाखाली वॅक्सिंन डेपो परिसरातील व इतर झाडांची कत्तल केली जात असताना वृक्ष वल्ली आम्हा सोयरे हा संदेश देत शंभर वर्षे पूर्ण झालेल्या वृक्षाचा वाढ दिवस साजरा करण्यात आला.
हट्टीहोळ गल्ली, शहापूर येथील एकता युवक मंडळाच्यावतीने आणि हट्टीहोळ गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, महिला मंडळ आणि श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा उत्सव मंडळ यांच्या सहकार्याने ” शतायुषी वटवृक्षाचा वाढदिवस “आणि दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
गल्लीत रोषणाई करण्यात आली होती. तसेच लख्ख दिव्यांनी मंदिर परिसर उजळून टाकण्यात आला होता. अवधूत जोशी यांनी पूजेचे पौरोहित्य केले. कार्यक्रमाला पाहुणे म्हणून माजी महापौर महेश नाईक, आयएमएचे अध्यक्ष आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद हलगेकर, सामाजिक कार्यकर्ते आणि डोनाल्ड डक शाळेचे संचालक जॅकी, अमर फर्निचरचे संचालक अमर अकनोजी, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सरकारनियुक्त नगरसेवक गिरीश धोंगडी, सामाजिक कार्यकर्ते गोपी पाटील, माजी नगरसेवक आणि टिळकवाडी साई मंदिराचे विश्वस्त मोहन चिगरे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी गल्लीतील पंच प्रभाकर नाकाडी होते.
प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत मंदिरात आरती व पूजा- अर्चा झाली. यानंतर वटवृक्षाचे पूजन करून केक कापून वटवृक्षाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर एकता युवक मंडळाचे अध्यक्ष सुनील पाटील, उपाध्यक्ष सोमशेखर मळगली, सचिव गजानन भेकणे, परशराम हुंबरवाडी, साईप्रसाद लाड, युवराज भांदुर्गे, शुभम शहापुरकर, विनायक जाधव यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
गल्लीतील सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेणाऱ्या श्रीमती शांता परशराम भेकणे व शिक्षक विजय पाच्छापुरे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. अनंत लाड यांनी आभार मानले. रवींद्र जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी गोविंद भेकणे, विनायक संभाजीचे, रोहित जांगळे, विजय बागी, विनायक हणगी, शुभम शहापुरकर, विराज लाड, सचिन हुंबरवाडी यासह अन्य कार्यकर्ते आणि गल्लीतील नागरिक उपस्थित होते.