कॅन्टोन्मेंट भाजी मार्केट सोडून आम्ही एपीएमसीत जाणार नाही आणि कसलीही दादागिरी आमच्यावर चालणार नाही असा इशारा भाजीपाला व्यापारी, दलाल आणि शेतकऱ्यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिला आहे. भव्य हजारोंच्या संख्येने मोर्चा काढून हा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी आर विशाल यांना निवेदन देण्यात आले आहे.
सर्व व्यापारी, दलाल व शेतकरी कॅन्टोन्मेंट भाजी मार्केट समोर जमले होते, त्यांनी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा दिल्या. भाजी मार्केट चे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यावर आम्ही तिथे जाऊ पण सध्या एपीएमसीत अपुरी व्यवस्था असल्याने आम्ही तिथे जाणार नाही असे सांगण्यात आले.
एक बैठक घेऊन एपीएमसीमधील भाजीपाला मार्केट सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे, काही पोलिस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबरीने एपीएमसीच्या सेक्रेटरीने हा निर्णय घेतला, त्या निर्णयाला कँटोनमेंट भाजी मार्केट मधील व्यापाऱ्यांनी विरोध केला असला तरी मंगळवारपासून एपीएमसीमधील भाजी मार्केट कोणत्याही परिस्थितीत सुरू करणारच असे सांगण्यात आले होते. या विरोधात हा मोर्चा झाला सर्व लहान सहान व्यापारी व शेतकरी हातामध्ये फलक घेऊन सहभागी झाले होते.
काल व्यापाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाला विरोध केला .आज सोमवारी भव्य मोर्चा काढून हा विरोध दाखवण्यात आला आहे. एकंदरीत परिस्थितीत शेतकऱ्याला हमीभाव मिळवून देणारे व्यापारी भडकले असून शेतकरी सुद्धा त्यांच्या पाठीशी थांबला आहे.
व्यापाऱ्यांनी दहा ते वीस वर्षापासून भाजीपाला मार्केट साठी स्वतंत्र जागा मिळावी म्हणून प्रयत्न केले. सुरुवातीला एपीएमसी कडे त्यानी अर्ज केला होता ,त्यानंतर महानगरपालिका कडे अर्ज केला पण त्यांना जागा मिळू शकली नाही. शेवटी त्यांनी स्वतःच्या हिमतीवर जागा खरेदी करून मार्केट उभे केले. मार्केटला परवानगी दिली जात नाही. त्यांच्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या त्या जागेतून करार संपल्यामुळे जागा खाली करण्याचा सपाटा लावण्यात आला होता मात्र न्यायालयीन लढाई करून व्यापाऱ्यांनी त्यावर स्थगिती मिळवली आहे, आता नवीन संकट समोर आले आहे येथील भाजी मार्केट खाली करून एपीएमसीमध्ये सुरू करावे असा आदेश व्यापाऱ्यांना देण्यात आला आहे. हा आदेश आपल्याला मान्य नाही असे या मोर्चा द्वारे सांगण्यात आले.
या परिस्थितीत हा अन्याय असल्याची भूमिका कायम ठेवून व्यापाऱ्यांनी आपला विरोधही कायम ठेवला आहे, एपीएमसीमध्ये 130 गाळे बांधण्यात आले आहेत त्यापैकी शंभर गाळे आधीच विकले गेले आहेत , फक्त 30 गाळे शिल्लक आहेत ,त्यामध्ये 230 व्यापाऱ्यांना सामावून घ्यायचे आहे, त्यामुळेच हा विरोध करण्यात आला आहे.
या परिस्थितीत शेतीमालाशी निगडित असलेले, शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळवून देणारे दलाल अडचणीत आल्यामुळे मोर्चात सहभाग मोठा होता, याची प्रशासनाला दखल घ्यावीच लागणार आहे.