Friday, April 19, 2024

/

सिव्हील हॉस्पिटल मध्ये गरज उष्माघात कक्षाची

 belgaum

बेळगाव शहरातील पारा आता 38 अंशापर्यंत गेला असून उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यावर उपाययोजना म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उष्माघात कक्षाची स्थापना करण्याची गरज निर्माण आहे. सध्या वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मागील पंधरा ते वीस दिवसांपासून त्यात वाढच होत आहे. बेळगावचा पारा 39 अंशांवर जाऊन पोहोचला होता. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे तो काहीसा कमी झाला असला तरी उष्माघाताचे रुग्ण मात्र वाढतच आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने खबरदारी घेऊन या कक्षाची स्थापना करणे ही काळाची गरज आहे.

तापमानात अचानक वाढ झाल्याने उष्माघाताचा आजारही बळावत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य खाते आणि जिल्हा प्रशासनाने कोणतीच खबरदारी घेतली नाही. शहराबरोबरच ग्रामीण भागातही उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. बाजारहाट करण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना याचा चांगलाच फटका बसत आहे.

District hospital

ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना या उष्माघाताची जाणीव अधिकच तीव्रतेने बसते. त्यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्षाची स्थापना करणे गरजेचे आहे. मध्यंतरी बेळगाव शहर आणि परिसरात वळवाने हजेरी लावली तरी उष्म्यात मात्र अधिकच वाढ होत आहे.

आणखी काही दिवस असेच गेले तर बेळगावचा पारा 40 हून अधिक वर पोहोचण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. सूर्य माथ्यावर आला की अनेकांना याचा अधिक त्रास जाणवू लागतो. आरोग्य विभागाने याची दक्षता घेऊन उष्माघाताची लक्षणे ओळखून उपचार करणाऱ्या कक्षाची स्थापना केल्यास नागरिकांना सोयीचे ठरणार आहे.

लक्षणे
उष्माघातामध्ये प्रामुख्याने थकवा जाणवणे, चक्कर येणे, ताप येणे, निरुत्साही वाटणे, त्वचा कोरडी होणे, डोकेदुखी, भूक मंदावणे, पोटामध्ये तीव्र वेदना, मनाची अस्वस्थता आदी लक्षणे आढळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.