बेळगाव तालुक्यात मराठीची अस्मिता बळकट आहे, मात्र राजकीय फायदा साधून घेण्यासाठी राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार आता आपली भाषा मराठी घेऊन पुढे येत आहेत, निवडणुकी पुरते मराठीत बोलून संधी साधण्याचा डाव असून ताई, माई, अक्कानी पक्का विचार करण्याची गरज आहे.
सध्या तालुक्यात मराठी आमंत्रणे आणि गिफ्ट वरील मराठी नावे गाजत आहेत. साडी, चोळी, कुक्कर आणि बरेच काही वाटणारी मंडळी आम्ही मराठी चा दुस्वास करत नाही असे सांगत पुढे येत आहेत, पण मराठी लिहितानाही बेळगाव चे बेळगावी केल्याशिवाय त्यांचे समाधान होत नाही हे ध्यानात घ्यावे लागेल.
सध्या मराठीचा पुळका आलेली ही मंडळी मराठी माणसाचे अधिकार मिळवून देण्यासाठी कधीच आवाज उठवत नाहीत, हे वास्तव आहे. तसे केले तर त्यांचे पक्ष त्यांना तिकिटच देणार नाहीत, पण कसेही करून निवडून येण्यासाठी मराठीचा वापर करून मराठी माणसाला भुलवण्याचे प्रयत्न करण्यात येत असून याची जोरात चर्चा आहे.
ग्रामीण मधल्या त्या ताई आणि दादांनी आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सीमाप्रश्न सुटून हा भाग महाराष्ट्रात सामील करण्यास प्रयत्न करू असे आश्वासन दिले तरी भुलून जायची गरज नाही, कारण मराठी माणसाला खुळे करून निवडून येण्याचा त्यांचा विचार दिसतोय, सावध राहून त्यांचे मनसुबे धुळीत मिसळण्याची गरज आहे.