Saturday, April 20, 2024

/

मालवण घटना -संपूर्ण बेळगाववर शोक कळा

 belgaum

 

मालवण येथील समुद्रात बुडून इंजिनियरिंग कॉलेजच्या प्राध्यापकासह आठ जण मृत्युमुखी पडल्यामुळे केवळ शैक्षणिक क्षेत्रातच  नव्हे तर संपूर्ण बेळगाव शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . धक्कादायक बाब म्हणजे कॉलेजकडून परवानगी न घेता विद्यार्थी आणि दोन प्राध्यापक मालवणला  गेल्याचा खुलासा मराठा मंडळच्या व्यवस्थापनाने केला आहे . इंजियरिंग कॉलेज चे प्राचार्य उडुपी यांनी सदर सहल कोलेजच्या परवानगीने नव्हती अशी माहिती दिली आणि दुपारीच संचालक प्रताप यादव आणि लक्ष्मण झनगरुचे हे मालवण ला रवाना झाले .

मराठा मंडळ इंजिनियरिंग कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन डिपार्टमेंटचे विद्यार्थी पुण्याला स्टडी टूरसाठी बेळगावहून बारा तारखेला गेले होते . पुण्याहून ते लवासा ,रायगड ,महाबळेश्वर करून शनिवारी सकाळी मालवणला पोचले . काही विद्यार्थ्यांनी आपल्या घरी फोन करून आपण आता मालवणला पोचलो असून दुपारी दोन वाजता मालवणहून निघून बेळगावला येणार असल्याचे कळवले होते . पण काही वेळातच मालवणच्या वायरी समुद्रकिनाऱ्यावर बेळगावच्या मराठा मंडळ इंजिनियरिंग कॉलेजचे आठ विद्यार्थी समुद्रात बुडून मृत झाल्याची बातमी सोशल मीडिया आणि चॅनेलवर यायला लागल्यावर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हृदयाचे ठोकेच चुकले . एकूण पन्नास जण गेले होते त्यापैकी आठ जण समुद्रात बुडाले आणि बेचाळीस जण वाचले . हि घटना कळताच मराठा मंडळ संस्थेवर आणि शिक्षण क्षेत्रात दुःखाचे सावट पसरले . सिंधुदुर्गच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी मराठा मंडळाच्या चेअरपर्सन राजश्री हलगेकर याना फोन करून कळवली . त्यानंतर राजश्री हलगेकर यांनी सूत्रे हालवून सगळी माहिती घेतली . लगेच कॉलेजच्या प्राचार्यासह मराठा मंडळ व्यवस्थापनाचे सदस्य देखील मालवणकडे रवाना झाले . समुद्रात बुडून मृत पावलेले प्राध्यापक महेश कुडुचकार हे शहापूरच्या आचार्य गल्लीत राहतात . एक वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले असून त्यांच्या पश्चात वृद्ध आई ,पत्नी आणि दोन विवाहित बहिणी आहेत . महेश यांच्या मेहुणीचे रविवारी लग्न आहे . आणि अशा वेळी दुःखद घटना घडली आहे . महेश यांच्या घरच्याना अद्याप महेश बुडून मृत झाल्याची बातमी सांगण्यात आली नाही पण त्यांच्या घरासमोर मित्र आणि आजूबाजूचे लोक जमले आहेत . अनुर बोन्द्रे हा विद्यार्थी देखील मालवणला गेला होता पण तो सुखरूप असल्याचे। त्याची आई रूपा बोन्द्रे यांनी सांगितले आणि आठ जणांच्या मृत्यूविषयी हळहळ व्यक्त केली .  सांबरा येथील साहित्य संघाचे दिलीप चव्हाण यांची मुलगी आरती चव्हाण तर गणेश नगर सांबरा तेथील करुणा बर्डे , बाँबरगा गावची माया कोल्हे, चुरमुरी गावचा किरण खांडेकर, काकती येथील नितीन मनतवाडकर , टेंगीनकरा गल्लीतील अवधूत ताशीलदार, आझाद नगर येथील मुजमिल हननीकेरी सामील आहेत.
काही जणांच्या पालकांना आपली मुलं पुण्यात स्टडी टूर ला गेलेत असा समज होता शेजारच्या घरात टी व्ही त तुमचा मुलगा समुद्रात बुडलाय अशी कल्पना दिली त्यावेळी त्यांचा ता घटनेवर विश्वास बसत नव्हता पालक सरळ कॉलेज ला गाठत होते आणी मग मालवण जात होते. शनिवारी रात्री उशिरा सगळी मृतकांची शव बेळगाव ला आणण्यात येणार असून रविवारी सकाळी विविध ठिकाणी अंतिम संस्कार केले जाणार आहेत .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.