बेळगाव लाईव्ह: खानापूर तालुक्यातील निडगल गावचे ग्रामदैवत आणि ‘सिद्धगुंढा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक मंदिरात अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केल्याची घटना शनिवार, ८ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. मंदिरातील शिवलिंग, नंदी, कासव आणि तुळशी वृंदावनाची नासधूस करण्यात आली आहे.
घटनेमुळे निडगलसह परिसरातील ग्रामस्थ आणि शिवभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. श्रावण महिना सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांची गर्दी वाढणार असतानाच हा प्रकार घडल्याने धार्मिक स्थळाच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
या तोडफोडीमागे नेमका कोणाचा हात आहे, तसेच धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला आहे का, याचा तपास करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
घटनेनंतर निडगल ग्रामस्थांनी खानापूर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस स्थानकाचे पीआय एल. एच. गोवंडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, तोडफोड करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ व भाविकांनी केली आहे.





