बेळगाव लाईव्ह :
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी कोल्हापूर येथे दाखल झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सीमा प्रश्नासंदर्भात चर्चा केली. यावेळी समितीच्या नेत्यांनी अमित शहा यांची भेट घडवून देण्याची विनंती केली.
समितीचे नेते तथा माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगून या प्रकरणाच्या सुनावणीला गती मिळणे आवश्यक असल्याचे नमूद केले. तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय थांबवण्यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

सीमाभागातील मराठी जनतेच्या विविध प्रश्नांकडे केंद्रीय गृहमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी अमित शहा यांची भेट महत्त्वाची असल्याचे समितीच्या शिष्टमंडळाने स्पष्ट केले. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती समितीच्या नेत्यांनी दिली.
यावेळी समितीच्या शिष्टमंडळातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.




