बेळगाव लाईव्ह : पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांवरून पालकमंत्री सतिश जारकीहोळी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी इंधन दरवाढ तातडीने नियंत्रणात आणण्याची मागणी केली.
“इंधन दरवाढीवर नियंत्रण ठेवणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. इतर देशांमध्ये अशा प्रकारे वारंवार दरवाढ होत नाही. अनावश्यकरीत्या दरवाढ करून जनतेवर आर्थिक भार टाकला जात आहे. आता इंधन दर पूर्ववत करण्यासाठी केंद्राने तातडीने पावले उचलली पाहिजेत,” असे सतीश जारकीहोळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “निवडणुका संपल्यानंतर इंधनाचे दर वाढवणे ही भाजपची जुनी रणनीती आहे. दरवाढीवर कोणतेही नियंत्रण उरलेले नाही. दर सहा महिन्यांनी इंधन दर वाढवले जात आहेत.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधताना त्यांनी, “पक्ष हा व्यक्तीपेक्षा मोठा असतो, हे पंतप्रधानांनी लक्षात घेतले पाहिजे. भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनीही याबाबत स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे,” असे म्हटले.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाचा उल्लेख करत त्यांनी भाजपच्या पूर्वीच्या आंदोलनांची आठवण करून दिली. “त्या काळात स्मृती इराणी यांनी गॅस सिलिंडर हातात घेऊन आंदोलन केले होते. आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे इंधन दरवाढीविरोधात आवाज उठवत आहेत,” असेही ते म्हणाले.
अधिवेशनाच्या कामकाजावर टीका करताना जारकीहोळी म्हणाले, “अधिवेशन बोलावले जाते, मात्र महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याआधीच ते आटोपते घेतले जाते. केंद्र सरकारच्या दरवाढीबाबत आता जनतेनेच निर्णय घ्यावा.”





