बेळगाव लाईव्ह :
अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने धाराशिव येथे आयोजित ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनात सीमाभागाचा प्रश्न आणि मराठी अस्मितेची वेदना प्रभावीपणे मांडणाऱ्या ‘माय’ या कवितेने रसिकांची मने जिंकली. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष तथा सीमाकवी रवींद्र पाटील (कुद्रेमनी) यांनी सादर केलेल्या या कवितेला उपस्थित साहित्यप्रेमींकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
लोकनेते अजितदादा पवार साहित्य नगरीत २९ व ३० मे रोजी पार पडलेल्या या दोन दिवसीय साहित्य सोहळ्याचे अध्यक्षपद डॉ. नंदकुमार राऊत यांनी भूषविले होते. उद्घाटन व विविध सत्रांना आमदार कैलास पाटील तसेच ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरद गोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. देशभरातील सुमारे २०० कवी, साहित्यिक आणि नवोदित लेखकांनी संमेलनात सहभाग नोंदविला.
विविध काव्यसत्रांमध्ये अनेक विषयांवरील कविता सादर झाल्या. मात्र रवींद्र पाटील यांच्या ‘माय’ या कवितेने सीमाभागातील मराठी जनतेच्या भावना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केल्या. बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी आणि बिदर या भागांतील मराठी बांधवांचा संघर्ष, वेदना आणि महाराष्ट्राशी असलेले अतूट भावनिक नाते कवितेतून जिवंत झाले.
“महाराष्ट्र माझी माय,
लेकरू बेळगाव रे…
ताटातून दूर गेलं,
तरी नातं जिव्हाळ्याचं रे…”
या ओळींनी सभागृहात भावनिक वातावरण निर्माण केले. सीमाभागातील मराठी माणसांच्या मनातील मायमहाराष्ट्राविषयीची ओढ आणि तुटूनही न तुटलेली नाळ याचे प्रभावी चित्रण या शब्दांतून झाले.
त्यानंतरच्या,
“माय तुझ्या कुशीत यावं,
हीच लेकराची आस…
सीमेवरती घुसमट होते,
तुटतो अंतरीचा श्वास…”
या ओळींनी उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला. सीमाभागातील मराठी समाजाची घुसमट आणि महाराष्ट्रात सामावून जाण्याची तीव्र इच्छा यामुळे अनेक श्रोते भावुक झाले.
सीमाभागातील मराठी अस्मितेचा संघर्ष अधोरेखित करताना कवी म्हणाले,
“बेळगावाची हाक ऐक,
कारवाराचं दुःख बघ…
बिदर-भालकीच्या अश्रूंमधला,
मराठीपणाचा जळतो मेघ…”
या ओळींना सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. सीमाभागातील मराठी जनतेच्या न्यायाच्या लढ्याला आणि सांस्कृतिक अस्मितेला कवितेतून प्रभावी अभिव्यक्ती मिळाली.

कविता सादर होत असताना अनेक रसिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. सीमाप्रश्न हा केवळ राजकीय विषय नसून मराठी भाषा, संस्कृती, अस्मिता आणि भावविश्वाशी निगडित प्रश्न आहे, हा संदेश या कवितेतून ठळकपणे पोहोचला.
संमेलनाध्यक्ष डॉ. नंदकुमार राऊत, आमदार कैलास पाटील, डॉ. शरद गोरे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनीही या कवितेचे विशेष कौतुक केले. सीमाभागातील मराठी जनतेच्या भावना आणि महाराष्ट्रावरील अखंड निष्ठा व्यक्त करणारी ‘माय’ ही कविता संमेलनातील सर्वाधिक चर्चेची आणि संस्मरणीय ठरली. तिच्या माध्यमातून सीमाप्रश्नाविषयी नव्याने जागृती निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




