बेळगाव लाईव्ह:पावसाळा जवळ येत चालला असल्यामुळे युद्ध पातळीवर गाळ काढून बळ्ळारी नाल्याची स्वच्छता करण्याबरोबरच काँक्रीटचे बांधकाम करून हा नाला सुरक्षित करावा, अशी विनंती वडगाव, बेळगाव येथील शेती सुधारणा युवक मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांसह बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे केली आहे.
शेती सुधारणा युवक मंडळाच्या शिष्टमंडळाने अमोल देसाई, रमाकांत कोंडुसकर, देविदास खन्नूकर व कीर्तीकुमार कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त विनंतीचे निवेदन आज जिल्हाधिकारी आणि खासदारांना सादर केले. वडगाव आणि येळ्ळूर गावातील शेतकरी बळ्ळारी नाल्याच्या दयनीय अवस्थेमुळे गंभीर समस्येचा सामना करत आहेत.
सदर सुमारे 32 कि.मी. लांबीचा हा नाला आजूबाजूच्या शेतांमधील पावसाचे पाणी आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी मुख्य जलनिःसारण वाहिनी म्हणून काम करतो. नाल्याच्या आजूबाजूची जमीन अत्यंत सुपीक असून सुमारे 600 एकर क्षेत्रावर पसरलेली आहे. या जमिनी शेतकरी पारंपरिकरित्या भात आणि विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करतात. गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे नाल्याची खोली कमी झाली आहे.
गाळावर वाढलेल्या उंच गवतामुळे आणि तणांमुळे पावसाळ्यात पाण्याच्या मुक्त प्रवाहात आणखी अडथळा निर्माण होत असतो. परिणामी पावसाळ्यात नाल्याच्या काठांवरून वाहणाऱ्या पाण्यामुळे लगतच्या सुपीक शेतांमध्ये दीर्घकाळ पूरस्थिती निर्माण होते. दरवर्षी हा प्रकार घडत असल्यामुळे 600 एकर मोक्याची शेतजमीन पावसाळ्यातील बहुतेक काळ पाण्याखाली राहते आणि तिचा वापर विशेषतः बासमती तांदूळ आणि भात यांसारख्या उच्च मूल्याच्या पिकांसाठी करता येत नाही.
या खेरीज ओसंडून वाहणारे नाल्याचे पाणी सभोवतालची जमीन दूषित करते, माती प्रदूषित करते आणि पशुधन व मानव या दोघांच्याही आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असतो. या परिस्थितीमुळे उपजीविकेसाठी पूर्णपणे या जमिनीवर अवलंबून असलेल्या 200 अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
दरवर्षी बळ्ळारी नाल्यालगतच्या सुपीक जमिनीचा एक मोठा भाग निरुपयोगी ठरतो, जे केवळ शेतकऱ्यांचेच नुकसान नाही, तर राष्ट्रीय कृषी उत्पादनाचे नुकसान आहे. तरी आपण या प्रकरणात तात्काळ वैयक्तिक हस्तक्षेप करावा. तसेच बळ्ळारी नाल्याची खोली आणि प्रवाह क्षमता पूर्ववत करण्यासाठी तात्काळ गाळ काढण्याचे निर्देश द्यावेत. याव्यतिरिक भविष्यात गाळ साचणे आणि पूर टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाय म्हणून नाल्याच्या काँक्रीट अस्तरीकरणाच्या बांधकामाचा विचार करावा.
यासाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार लवकरात लवकर बाधित भागाला भेट द्यावी, जेणेकरून तुम्ही परिस्थितीचे गांभीर्य स्वतः तपासू शकाल. आम्हाला खात्री आहे की तुमच्या समयोचित कृतीमुळे सुपीक जमिनीचे पुढील नुकसान टळेल, मातीचे प्रदूषण टाळता येईल आणि शेकडो अल्पभूधारक शेतकऱ्यांना पुन्हा उत्पादक शेती करण्यापासून रोखता येईल, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकारी व खासदार शेट्टर यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी अमोल देसाई, रमाकांत कोंडुसकर, देविदास खन्नूकर, कीर्तीकुमार कुलकर्णी, मनोहर हलगेकर, रामचंद्र पाटील, मंगेश नागोजीचे, उमेश पाटील आदी शेती सुधारणा युवक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.





