बेळगाव लाईव्ह : यंदा मान्सून वेळेपूर्वीच दाखल होण्याच्या हवामान खात्याच्या अंदाजानंतर शेतकरी संघटनांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. बेळगावमध्ये आज भारतीय कृषक समाजाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठवून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कीटनाशकांची टंचाई भासू नये म्हणून प्रशासनाने चोख व्यवस्था करावी, अशी मागणी भारतीय कृषक समाज संयुक्त शेतकरी संघटनेने केली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सिदगौडा मोदगी यांच्या नेतृत्वात आणि बेळगाव जिल्हाध्यक्ष संजीव डोंगरेगावकर यांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले.
खत पुरवठ्यासाठी असलेला जाचक नियम मागे घेऊन तो पूर्वीसारखाच खुला करावा आणि बनावट कृषी साहित्याची विक्री थांबवण्यासाठी विशेष तपास पथक नेमावे, असे निवेदनात नमूद आहे. तसेच, तांत्रिक कारणांमुळे नाकारलेले पीक विम्याचे अर्ज पुन्हा तपासून नुकसानभरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दुसरीकडे, केंद्र सरकारच्या धोरणांवर आक्षेप घेत चालू हंगामातील शेतीमालाचा हमीभाव महागाईच्या निर्देशांकानुसार वाढवावा, असे शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे.
यासोबतच शेतीकामासाठी सवलतीच्या दरात डिझेल उपलब्ध करून द्यावे आणि ऊसाचा दर प्रति टन ५ हजार रुपये निश्चित करावा, अशी आग्रही मागणी चिक्कोडी जिल्हाध्यक्ष दुंडनगौडा पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.





