बेळगाव लाईव्ह: भाजपला सोडून काँग्रेस पक्षात गेलेले आमदार लक्ष्मण सवदी कोणत्याही परिस्थितीत पुन्हा भाजपमध्ये येणार नाहीत आणि जर एखाद्या वेळी ते भाजपमध्ये आले तर आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही, असे गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी सांगितले.
अथणी (जि. बेळगाव) येथे काल मंगळवारी एका खाजगी कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार लक्ष्मण सौदी त्यांचा पक्ष सोडून पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये येणार असल्याची अथणी मतदार संघात चर्चा आहे. लोक तसं बोलत आहेत मी नाही.
अथणी मधील भाजप कार्यकर्त्यांना गोंधळात टाकण्यासाठी लक्ष्मण सवदी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी हे तंत्र अवलंबले आहे. अशा तंत्रांना अफवांना भाजप कार्यकर्ते आणि नेतेमंडळींनी बळी न पडता संघटित राहून पक्षाचे कार्य करावे.
येत्या 2028 मधील निवडणुकीमध्ये भाजप उमेदवाराला विजयी करण्यासाठी आपण आत्तापासूनच कार्याला लागले पाहिजे.
यावेळी भाजप कार्यकर्त्यांना संघटीत ठेवण्याद्वारे भारतीय जनता पक्षाला विजयी करण्याच्या दृष्टीने पक्षबांधणी केली जात आहे. आगामी निवडणुकीमध्ये भाजपला विजयी करणे हे आमचे एकमेव लक्ष्य असणार आहे, असे आमदार रमेश जारकीहोळी यांनी पुढे स्पष्ट केले.





