बेळगाव लाईव्ह : तब्बल ४३ वर्षांनंतर बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक येथे ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या थाटामाटात सुरू झाली आहे. बुधवारी सकाळी भंडाऱ्याच्या उधळणीत आणि ‘महालक्ष्मी’च्या जयघोषात भव्य रथोत्सव सोहळा पार पडला.
मंगळवारी अक्षतारोपण झाल्यानंतर बुधवारी सकाळपासूनच रथोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. गावातील श्री गणेश आणि श्री कलमेश्वर मंदिरापासून रथाची मिरवणूक सुरू झाली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात हजारो भाविकांनी हा रथ ओढला. यावेळी भक्तांनी श्रद्धेने रथावर खारीक, खोबरे, केळी आणि भंडाऱ्याची उधळण करत उत्साहात रथोत्सवात सहभाग घेतला.
गेल्या दोन महिन्यांपासून या सोहळ्यासाठी ग्रामस्थ अहोरात्र कष्ट घेत होते. ४३ वर्षांनंतर हा ऐतिहासिक क्षण अनुभवताना जुन्या पिढीतील ग्रामस्थांच्या आठवणींना उजाळा मिळाला, तर तरुण वर्गामध्ये मोठा उत्साह दिसून आला. गावाच्या सुख-समृद्धीसाठी भाविकांनी यावेळी मनोभावे प्रार्थना केली.

यात्रेच्या यशस्वी नियोजनासाठी ग्रामस्थ, यात्रा पंच कमिटी आणि ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. पुढील सात दिवस ही यात्रा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी होणार आहे.
बुधवारी पार पडलेल्या या भव्य रथोत्सवानंतर श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती आता गदगेवर विराजमान झाली आहे. या नऊ दिवसांच्या उत्सवामुळे कंग्राळी बुद्रुकमध्ये भक्तीचे वातावरण निर्माण झाले असून, बेळगाव परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत.




