बेळगाव लाईव्ह : ऑटोरिक्षा मीटरची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आरटीओची असून पोलीस केवळ भाड्यासंबंधीच्या तक्रारींवरच कारवाई करतील, असे बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले आहे.
बेळगाव शहरात गेल्या कांही दिवसांपासून मीटर सक्तीच्या मुद्द्यावर ऑटो रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी भाडे ठरवताना वाद वाढत असून प्रवाशांकडून मनमानी दर आकारले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.
या पार्श्वभूमीवर गेल्या शुक्रवारी पत्रकार परिषदेत मीटर सक्तीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी, मीटर सक्ती लागू करण्याचा निर्णय हा प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांचा आहे.
त्यांनी मीटर सक्ती जारी करावी, यादरम्यान भाडे आकारणी बाबत तक्रारी झाल्यास त्यावर पोलीस कार्यवाही करतील. पोलिसांची भूमिका केवळ कायद्याची अंमलबजावणी व सुव्यवस्था राखण्यापूर्वी मर्यादित आहे असे स्पष्ट केले. दरम्यान, ऑटोरिक्षा मीटर अंमलबजावणी रखडल्याने चालक आणि प्रवाशांमधील वाद वाढत आहे.
सध्या ऑटोरिक्षा संघटनांनी मीटर सक्तीला विरोध दर्शविला असून इंधन दरवाढ, देखभाल खर्च आणि शहरातील वाहतूक परिस्थिती याचा विचार करून भाडे दर पुनर्निर्धारित करावेत अशी मागणी केली आहे, तर दुसरीकडे प्रवाशांनी मीटर सक्ती प्रभावी आणि त्वरित जारी करून मनमानी रिक्षा भाडे आकारणीला आळा घालण्याची मागणी केली आहे.




