बेळगाव लाईव्ह : अनेक वर्षांपासून रखडलेला बेळगाव–धारवाड नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प आता पुन्हा मार्गावर आला असून, जमीन संपादनाची मोठी अडचण दूर करण्यात प्रशासनाला यश आले आहे. अवघ्या चार महिन्यांत सुमारे १,२०० एकर जमीन संपादन पूर्ण करण्यात आली आहे.
उपायुक्त मोहम्मद रोशन यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया वेगाने राबविण्यात आली. प्रकल्पासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा भरपाई निधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी ६० कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने वितरित केली जाणार आहे.
एकूण ७३ किमी लांबीच्या या रेल्वे मार्गासाठी सुरुवातीला सुमारे १,४३६ एकर जमिनीची गरज होती. त्यापैकी बहुतांश जमीन बेळगाव जिल्ह्यात संपादित झाली असून, धारवाड जिल्ह्यातील काही हिस्सा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे १८० शेतकऱ्यांचा विरोध होता. मात्र प्रशासनाने संवाद आणि समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांच्या शंका दूर करत त्यांची संमती मिळवली.
केंद्र आणि राज्य शासनाच्या ५०:५० खर्च वाटप योजनेतून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा रेल्वे मार्ग कित्तूरमार्गे जाणार असून, बेळगाव–धारवाड दरम्यानचा प्रवास वेळ कमी होण्यासोबतच प्रादेशिक संपर्क आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्णत्वाकडे जात असल्याने, या बहुप्रतिक्षित रेल्वे प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम येत्या डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.





