बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील पांगुळ गल्लीयेथील अश्वत्थामा मंदिरासमोर लोटांगण घालण्याची परंपरा देखील प्रतिवर्षाप्रमाणे पार पडली. नवसपूर्ती झालेल्या भक्तांनी अश्वत्थामा मंदिरा समोर लोटांगण घालून नवस फेडला.
यंदा चंद्रग्रहण असल्याने सकाळी साडेआठ ते साडे दहाच्या दरम्यानच लोटांगणाचा कार्यक्रम पार पडला.लोटांगण कार्यक्रमाच्यावेळी शेकडो भाविक पांगुळ गल्लीत उपस्थित होते.
11 रुद्र आणि 7 चिरंजीवी पैकी एक अवतार ठरलेला, गुरु द्रोणाचार्यांचा मुलगा आणि अदृश्य आणि अमरत्व लाभल्याने महाभारतातील कुरुक्षेत्रातील लढाईचा आजवरचा एकमेव जिवंत साक्षीदार मानला जाणारा अश्वत्थामा. त्याचे दक्षिण भारतातील एकमेव मंदिर बेळगावात आहे.
पांगुळ गल्लीतील या अश्वत्थामा मंदिरात दरवर्षी होलिकोत्सव साजरा होतो. मंगळवारी बेळगाव शहरातील रंगपंचमीच्या निमित्ताने हजारो भाविकानी लोटांगण घातलं.अतिशय प्राचीन असे हे मंदिर आहे. गेल्या 10 वर्षांपूर्वीच या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. अश्वत्थामाचे हे जागृत मंदिर म्हणून ओळखले जाते. येथे कोणतीही मागणी करून लोटांगण घातल्यास ती पूर्ण होते असे लोक मानतात.

होळी हा सण जुन्या रूढी परंपरा आणि विकृतीचे दहन करून नवी वाटचाल करण्याचा संदेश देतो. हा संदेश पाळत पांगुळ गल्लीत प्राचीन परंपरेला जपुन होळी साजरी होते.कोल्हापूर, गोवा, बेळगाव आणि आसपासच्या परिसरातील भाविक येथे दाखल होतात.
मध्यप्रदेश येथील बुऱ्हाणपूर मध्ये अश्वत्थामा मंदिर असल्याच्या नोंदी आढळतात. दरम्यान बेळगावच्या मंदिराची ख्यातीही संपूर्ण देशभरात आहे.याठिकाणी स्त्री पुरुष आणि तरुण तरुणी उपस्थित राहून आपल्या मागणीप्रमाणे लोटांगण घालण्याची प्रथा पूर्ण करीत आले आहेत.




