बेळगाव लाईव्ह : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संतप्त आंदोलनाच्या तीव्रतेने राज्याचे साखर खाते ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या थेट निर्देशानुसार, साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी आज गुरुवारी अचानक हुबळीतून बेळगावकडे धाव घेतली आहे.
शेतकऱ्यांकडून निषेध आणि घेराव घालण्याची शक्यता असल्यामुळे, मंत्र्यांनी आपला हा प्रवास संपूर्णपणे गोपनीय ठेवला होता. कोणतीही पूर्वसूचना न देता, मंत्री पाटील यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि साखर आयुक्त यांना एका गुप्त ठिकाणी बोलावून तात्काळ बैठक घेतली.
जिल्ह्यात ऊसाच्या एफआरपी सोबत अतिरिक्त दर निश्चित करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना त्वरित घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेण्याचे आणि समस्येवर तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. मंत्र्यांनी या बैठकीत जिल्हा प्रशासनाचे प्रमुख आणि साखर आयुक्तांसोबत सद्यस्थिती, आंदोलनाचे स्वरूप आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर समग्र चर्चा केली.

ऊस उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने गंभीर प्रयत्न सुरू केले असून, या गुप्त बैठकीचा तपशील आणि पुढील कार्यवाहीच्या सूचना लवकरच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सादर केल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
साखर मंत्र्यांची ही अचानक आणि गोपनीय हालचाल शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने घेतलेले महत्वाची दखल ठरू शकते का? या गुप्त बैठकीतून ऊस दराच्या आंदोलनाचा शेवट गोड होईल का? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे….


