Monday, May 12, 2025

/

चव्हाट गल्लीत लोकांच्या आरोग्याशी खेळ; सांडपाणी मिश्रित पिण्याचे पाणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :विविध आजारांना निमंत्रण देणाऱ्या सध्याच्या ऐन उन्हाळ्यात चव्हाट गल्ली येथील घरगुती नळांना ड्रेनेजचे सांडपाणी मिश्रित गढूळ पिण्याचे पाणी येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तरी मनपा आयुक्त व आरोग्य खात्यासह एल अँड टी कंपनीने याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

शहरातील चव्हाट गल्ली येथील घरगुती नळांना गेल्या जवळपास महिनाभरापासून पिण्याचे पाणी गढूळ स्वरूपात येत आहे. या पाण्याला ड्रेनेजच्या सांडपाण्याची दुर्गंधी देखील येत असते. याबाबत तक्रार करून देखील दखल घेतली जात नसल्यामुळे नागरिक विशेष करून गल्लीतील गृहिणीवर्गाला नाईलाजाने सदर दूषित पाण्याचा स्वयंपाक व पिण्यासाठी वापर करावा लागत आहे.

तथापि यामुळे नागरिक विशेष करून वृद्ध मंडळी व मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. पोटदुखी उलट्या, जुलाब वगैरे समस्या वारंवार उद्भवू लागल्या असून गॅस्ट्रो, कावीळ सारखे आजार होऊन तेथील नागरिक व मुलांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तेंव्हा महापालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी आणि शहर पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन युद्धपातळीवर योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी चव्हाट गल्लीतील त्रस्त व संतप्त गृहिणीवर्गाने बेळगाव लाईव्हशी बोलताना केली.

याप्रसंगी अधिक माहिती देताना स्थानिक नागरिक स्वप्निल बसवंत जोगानी यांनी सांगितले की, आमच्या गल्लीत गेल्या कित्येक वर्षापासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. अलीकडे 24 तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाईपलाईन घालून देण्यात आली आहे मात्र त्यानंतर आज पर्यंत त्याचे मीटर बसवण्यात आलेले नाही आणि 24 तास पाणीपुरवठाही सुरू झालेला नाही.

यात भर म्हणून आता गेल्या महिन्याभरापासून आमच्या गल्लीतील घरगुती नळांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्याऐवजी गढूळ सांडपाणी येत आहे. नळांना येत असलेल्या ड्रेनेजच्या दुर्गंधीयुक्त सांडपाणी मिश्रित पिण्याच्या पाण्यामुळे नागरिकांच्या विशेष करून लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

पोट दुखी, गॅस्ट्रो, जुलाब, अतीज्वर, कावीळ वगैरे होऊन येथील वयोवृद्ध नागरिक, लहान मुले आजारी पडू लागली आहेत. यासंदर्भात एल अँड टी च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते फोन उचलत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी एल अँड टी कंपनीला शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी दिली आहे की समस्या वाढवण्यासाठी दिली आहे? असा आमचा सवाल आहे.

तसेच महापालिका अधिकाऱ्यांना सांगावेसे वाटते की एल अँड टी पेक्षा पूर्वीची पाणीपुरवठ्याची पद्धत चांगली होती. गेल्या अडीच वर्षापासून आम्ही 24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी प्रति कुटुंब 175 रुपये पाण्याचे बिल भरत आहोत. मात्र त्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा देखील केला जात नाही असे सांगून तेंव्हा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एल अँड टी च्या अधिकाऱ्यांनी आमच्या समस्येची गांभीर्याने दखल घ्यावी आणि पाण्याचे मीटर बसून आम्हाला सुरळीत स्वच्छ पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी स्वप्निल जोगानी यांनी शेवटी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.