बेळगाव लाईव्ह : “लग्नगाठी स्वर्गात ठरतात” असे म्हटले जाते, परंतु सध्या कौटुंबिक न्यायालयात दाखल होणारी असंख्य प्रकरणे पाहता, हे म्हणणे किती खरे आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
पती-पत्नी एकमेकांविरुद्ध विविध मागण्यांसाठी मोठ्या संख्येने न्यायालयात धाव घेत असल्याने, कौटुंबिक न्यायालये नेहमीच गजबजलेली दिसतात. मात्र, कौटुंबिक न्यायालयात दाद मागण्यासाठी कायदेशीररित्या विवाहित असणे आवश्यक आहे.
परंतु बेळगावमध्ये एक अत्यंत वेगळे आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका ३९ वर्षीय उच्चशिक्षित (पीएच.डी. धारक) महिलेने ४७ वर्षीय व्यक्तीविरुद्ध पोटगी आणि घटस्फोटासाठी एकाच वेळी दावा दाखल केला होता. विशेष म्हणजे, सदर व्यक्तीचे यापूर्वीच लग्न झालेले असून, त्याला २० आणि १८ वर्षांची दोन मोठी मुले आहेत. या व्यक्तीचा त्याच्या पहिल्या पत्नीसोबत धारवाड न्यायालयात घटस्फोट झाला होता, पण पहिल्या पत्नीने धारवाड उच्च न्यायालयात या घटस्फोटाविरोधात अपील दाखल केले असून ते सध्या प्रलंबित आहे.

या कायदेशीर त्रुटीचा फायदा घेत दुसऱ्या महिलेने आपण कायदेशीर पत्नी असल्याचे भासवून बेळगाव कौटुंबिक न्यायालयात सदर व्यक्तीविरुद्ध दावे दाखल केले. २०२१ पासून या व्यक्तीला धारवाडहून बेळगाव कोर्टात ये-जा करावी लागत होती. सदर व्यक्ती सरकारी नोकर असल्याने त्याच्याकडून मोठी रक्कम उकळण्याच्या उद्देशाने महिलेने हे डावपेच आखले असावेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे, सदर व्यक्तीची बाजू मांडणारे बेळगावचे नामांकित कौटुंबिक आणि फौजदारी वकील सिद्धार्थराजे सावंत यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद करत कायदेशीर लग्न झाले नसल्याचे सिद्ध केले. या युक्तिवादानंतर बेळगावच्या पहिल्या अतिरिक्त प्रधान कौटुंबिक न्यायालयाने महिलेने दाखल केलेले दोन्ही दावे फेटाळून लावले.
या प्रकरणामुळे कायदेशीर विवाहांशिवाय दाखल होणाऱ्या दाव्यांची आणि त्यातून होणाऱ्या त्रासाची चर्चा पुन्हा एकदा समोर आली आहे.