बेळगाव लाईव्ह : एप्रिल आणि मे महिन्यात वाढणारे उच्च तापमान लक्षात घेता, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांना ३० टक्के कामावर सूट देण्यात आलेली आहे. या सवलतीचा लाभ कामगारांनी घ्यावा, असे जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी सांगितले.
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर, या दोन महिन्यांत मनरेगाच्या कामकाजासाठी श्रमिकांना अडचण होऊ नये म्हणून कामाचे प्रमाण ३० टक्के कमी करण्यात आले आहे. तसेच, विशेष दिव्यांग आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के कामाचे प्रमाण कमी करण्यात आले आहे.
कामाच्या ठिकाणी प्रथमोपचार पेटी, सावली आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि ग्रामीण भागातील सर्व कामगारांनी त्यानुसार काम करावे आणि त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.
उन्हापासून बचाव करण्यासाठी, कामगारांनी शक्य तितक्या लवकर कामावर जावे, त्यांचे नेमून दिलेले काम पूर्ण करावे आणि नंतर घरी जावे, ज्यामुळे त्यांचे आरोग्य जपले जाईल. मजुरांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.