Monday, May 12, 2025

/

देवाच्या दरबारी चोरीची उकल गाऱ्हाण्याने होईल का?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : चोरी झाली की पोलिस ठाण्याची पायरी चढली जाते. पण गोजगे गावातील ग्रामस्थांनी वेगळी वाट निवडली. त्यांनी थेट देवाच्या दरबारी गाऱ्हाणं घातलं. देवाचा कोप दाखवून चोरलेली संपत्ती परत मिळू शकते का? याकडे आता साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

बेळगाव तालुक्यातील गोजगे गावातील स्वयंभू महाकलमेश्वर मंदिरात अलीकडेच झालेली चोरी केवळ एका धार्मिक स्थळातील घटना नसून, ती भाविकांच्या श्रद्धेवर झालेली थेट घाव होती. घंटा, समई, मूर्ती अशी पवित्र व मौल्यवान साधने चोरून नेण्यात आल्याने गावकऱ्यांनी केवळ पोलिसांत तक्रार न करता, आध्यात्मिक मार्गाचा आधार घेतला.

ग्रामस्थांनी गाऱ्हाणे घालून देवाला साकडे घातले. “चोरावर तुझा कोप होवो आणि चोरलेलं सर्व साहित्य परत मिळो.” या गाऱ्हाण्याच्या अनुषंगाने संपूर्ण गावाने वार पाळवणूक केली, देवदर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि धार्मिक शिस्तीचा एक अनोखा संदेश दिला.

मात्र, यामागे एक प्रश्न उभा राहतो, गाऱ्हाणे घातल्याने चोराला जाग येईल का? त्याचं अंतःकरण द्रवेल का? चोर आपली चूक मान्य करेल आणि देवाच्या भीतीपोटी दागिने परत आणून ठेवेल का? हा केवळ श्रद्धेचा प्रश्न नाही, तर आपल्या समाजव्यवस्थेतील नैतिकतेचा आरसा आहे.

गाऱ्हाणं म्हणजे निव्वळ एक धार्मिक कृती नव्हे, तर चुकीला शिक्षा होईल, असा एक सार्वजनिक दबावदेखील. चोरावर सामाजिक-धार्मिक भय निर्माण करण्याचा प्रयत्न, जो कदाचित कायद्याच्या चौकटीपेक्षा अधिक प्रभावी ठरतो, हे ग्रामस्थ मानतात.

गोजग्यातील ही घटना आपल्याला विचार करायला लावते. चोरीसारख्या गंभीर घटनांमध्ये देवाच्या दरबारी केलेलं गाऱ्हाणं खरंच न्याय देऊ शकतं का? की त्यासाठी समाजाने पोलिस, प्रशासन आणि न्याययंत्रणेलाच अधिक बळ द्यायला हवं?

दरम्यान, सव्वा महिना मंदिर बंद ठेवण्यात येणार असून, भाविकांनी संयम बाळगावा आणि देवाच्या कृपेवर विश्वास ठेवावा, असं आवाहन देवस्थान पंच कमिटीने केलं आहे. चोरट्याला अंतरात्मेची जाणीव होईल का, याची प्रतीक्षा मात्र सर्वांच्याच मनात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.