Monday, May 13, 2024

/

पीओपी’ श्रीमूर्तीचा प्रश्न केंव्हाच निकालात, बाऊ नको -कलघटगी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावातील पीओपी अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेश मूर्तींबाबत महामंडळाने सरकार दरबारी आपली बाजू मांडली असून हा प्रश्न निकालात निघाला आहे. तेंव्हा उत्सव तीन-चार दिवसांवर आला असताना कोणीही त्याचा बाऊ करू नये, असे मध्यवर्तीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बेळगावचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी स्पष्ट केले आहे.

कर्नाटकाचे पर्यावरण मंत्री ईश्वर खांड्रे यांनी राज्यात पीओपीच्या श्री गणेश मूर्ती तयार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे. कर्नाटकात बेळगावमध्ये श्री गणेशोत्सव सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शेकडो मूर्तिकार या ठिकाणी आहेत. सध्या अनेक घरगुती आणि सार्वजनिक श्रीमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आता श्री गणेश उत्सव ऐन तोंडावर आला असताना मंत्री खांड्रे यांचे फौजदारी गुन्ह्याचे वक्तव्य समोर आले आहे. या संदर्भात बेळगाव लाईव्हने मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाची भूमिका जाणून घेतली असता विकास कलघटगी यांनी उपरोक्त स्पष्टीकरण दिले.

ते म्हणाले की, श्री गणेश महामंडळाच्यावतीने आम्ही यासंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे. राज्य सरकार पर्यावरण खात्याच्यावतीने मंत्री ईश्वर खांड्रे यांनी जे वक्तव्य केले आहे त्यावर आमचे म्हणणे असे आहे की बेळगाव शहर उपनगरातील 378 हुन अधिक सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळांकडून गणेश उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे यापूर्वी आम्ही केलेल्या विनंतीवरून महापालिकेने जुना कपिलेश्वर तलाव, नव्याने बांधलेला कपिलतीर्थ तलाव, जक्कीरहोंड रामेश्वरतीर्थ त्याचबरोबर जुने बेळगावचा कलमेश्वर तलाव, वडगावचा तलाव, किल्ला तलाव या ठिकाणी कुंड बांधले आहेत.

 belgaum

या पद्धतीने महापालिकेने विविध सात ते आठ ठिकाणी विसर्जन कुंड बांधले आहेत. कुंडातील पाणी हे वाहते नसल्यामुळे श्री गणेश उत्सवाला प्रारंभ होण्यापूर्वी दोन दिवस आधी या सर्व कुंडांची साफसफाई करून त्यात स्वच्छ पाणी भरले जाते. प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली जाते. सदर तलाव आणि जल कुंडांमध्ये शहरातील दीड दिवसाचे, पाच दिवसांचे, सात दिवसांचे किंवा अकरा दिवसांचे घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीचे मोठ्या प्रमाणात विसर्जन केले जाते.Vikas

सर्वसामान्यपणे श्री गणेश मूर्ती या शाडूच्या केल्या जातात. मात्र सार्वजनिक श्री गणेश मूर्ती 10 -12 फूट, 15 फूट उंचीच्या असल्यामुळे त्यांच्यासाठी फक्त पीओपी वापरत नाहीत तर कागद, रठ्ठ, गवत अशा विविध वस्तूंचा वापर केला जातो. लोकांना आता पर्यावरणाचे महत्त्व समजले असल्यामुळे ते स्वतःहून पीओपीच्या विरुद्ध आहेत. तथापि आता बीड, कोल्हापूर, सांगली, सातारा अशा परगावच्या ठिकाणाहून येणाऱ्या ज्या घरगुती मूर्ती आहेत त्यांचेही शहरातील विसर्जन तलावांमध्ये विसर्जन केले जाते. मात्र वाहत पाणी नसल्यामुळे श्री गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशीनंतर 15-20 दिवसांनी पाणी कमी करून मूर्तींचे जे अवशेष असतात, जो गाळ असतो मोठ्या वाहनात भरून महानगरपालिका शहराबाहेरील सरकारी पडीक जमिनीमध्ये मोठा खड्डा खोदून त्याची विल्हेवाट लावत असते. पर्यावरण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महापालिकेकडून ही काळजी घेतली जाते. वैयक्तिक बेळगाव शहराचे बोलायचे झाले असे या ठिकाणी मोठे नदी -नाले नाहीत. त्यामुळे श्री मूर्ती विसर्जनासाठी तलाव व जलकुंडांशिवाय पर्याय नाही.

सार्वजनिक श्री गणेश उत्सव महामंडळ शहर उपनगरातील 378 वरून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांचे गेल्या 32 वर्षापासून नेतृत्व करत आहे. यापूर्वी मध्यंतरी पीओपीचा हा प्रश्न तीव्र झाला होता. त्यावेळी सरकार दरबारी आम्ही आमची बाजू मांडली होती. पीओपीचा प्रश्न खरंतर निकालात निघाला आहे. आता श्री गणेशोत्सव अवघ्या तीन-चार दिवसावर येऊन ठेपला आहे. तेंव्हा कोणीही पीओपीचा बाऊ न करता उत्सव सुरळीत पार पाडावा असे मला वाटते, असे विकास कलघटगी यांनी शेवटी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.