Saturday, April 20, 2024

/

होळी, रंगपंचमीबाबत सामाजिक कार्यकर्त्यांचे आवाहन

 belgaum

होळी उंच उभारून स्पर्धा -इर्षा न करता पर्यावरण संरक्षणासाठी लहान प्रतीकात्मक होळी उभारावी. रंगपंचमीला नैसर्गिक आणि कोरड्या रंगांचाच वापर करावा. रासायनिक रंग वापरू नयेत आणि भटकी कुत्री आणि जनावरांच्या अंगावर रंग उडवू नयेत, असे कळकळीचे आवाहन आज होळी आणि उद्याच्या धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.

होळी आणि धुलीवंदन अर्थात रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव लाईन प्रतिक्रिया जाणून घेतली असता वरील प्रमाणे आवाहन करण्यात आले आहे. सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांनी रंगपंचमीसाठी नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात यावा. शक्यतो ते रंग कोरडे असावेत, जेणेकरून रस्त्यावरील भटकी कुत्री अथवा मोकाट जनावरांच्या अंगावर पडला तरी त्या रंगाचा त्या प्राण्यांना त्रास होणार नाही.

रंगपंचमी दिवशी आज-काल आपण रासायनिक रंगांचा वापर करतो. त्यानंतर अंघोळ वगैरे करून स्वच्छ देखील होतो. रासायनिक रंगांमुळे त्वचेला त्रास होऊन काहीं लोकांना त्रासही सहन करावा लागतो. हे इतपतच मर्यादित असते, मात्र मोकाट भटक्या जनावरांच्या बाबतीत त्यांच्या शरीराला अंघोळ वगैरे पाण्याचा स्पर्शही झालेला नसतो. त्यामुळे रासायनिक रंगांमुळे त्यांना दुर्धर जीवघेण्या विकारांना सामोरे जावे लागते. हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. याव्यतिरिक्त होळी उभारताना आमची होळी मोठी की त्यांची होळी मोठी अशी स्पर्धात्मक भावना बाळगली जाते. ही बाब पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे. कारण अशा उंच मोठ्या होळी जेंव्हा जळतात, त्यावेळी त्यांच्या धगीमुळे आसपासच्या आसपासच्या वृक्षवल्लींवरही विपरीत परिणाम होऊन त्या नष्ट होण्याचा धोका असतो.Rang panchami

तेंव्हा जागतिक पर्यावरणाचा प्रश्न लक्षात घेता होळी ही प्रतिकात्मकरित्या साजरी केली जावी. शेणी आणि थोडीफार लाकडे वापरून आपण होलिकोत्सव साजरा करू शकतो हे लक्षात घेणे काळाची गरज आहे असे सांगून सुरेंद्र अनगोळकर यांनी आपल्या फाउंडेशनतर्फे शेणी मोफत उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच त्यासाठी 9880089798 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

शहरातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी देखील शक्यतो नैसर्गिक रंगांचा आणि तो देखील पावडर स्वरूपात असलेल्या रंगांचा वापर करावा असे मत व्यक्त केले. रंगपंचमी दिवशी रासायनिक रंग वापरले जातात. ते पाण्यात वापरून जबरदस्तीने एकमेकांना लावले जातात. त्यामुळे घातक रासायनिक घटक त्वचेतून शरीरात जातात आणि त्यामुळे त्वचा संसर्ग होतो. बऱ्याचदा हे रासायनिक रंग आपल्या डोळ्यांनाही इजा पोचवू शकतात. याबाबत वारंवार जागृती करून देखील बरेच जण रासायनिक रंगांचा वापर करतात. यासाठी खबरदारी म्हणून प्रत्येकाने अंगाला खोबरेल वगैरे तेल लावणे उचित असते. त्यामुळे रासायनिक रंगांचा थेट त्वचेवर परिणाम होत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रंगपंचमी दिवशी प्राण्यांवर रंग उडवू नये असे सांगून संतोष दरेकर यांनी अनगोळकर यांच्याप्रमाणे मत व्यक्त केले. ते म्हणाले की भटकी कुत्री, मांजर अथवा मोकाट जनावरे यांच्यावर रंग फेकल्यास त्वचा नाजूक असल्यामुळे कालांतराने त्या रंगामुळे त्यांच्या त्वचेवर गाठी येतात.

होळी आणि रंगपंचमी दिवशी प्रामुख्याने भांग वगैरे नशापाणी केले जाते. मद्यपीनचे मद्यपान या दोन दिवसात जास्तच असते त्यामुळे वाहनांचे अपघात वगैरे दुर्घटना घडत असतात. बरेच जण अति मद्यपानामुळे आपल्या घरी न पोहोचता अपघाताने रस्त्याशेजारी गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या असतात. अशा लोकांना मदत करण्यास आम्ही सिद्ध आहोत. गरजूंना रक्तदानाबरोबरच वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धडपडणारी आमची संघटना अशा लोकांना मदत करण्यासही सिद्ध आहे. तरी आज होळी आणि उद्या रंगपंचमी दरम्यान नागरिकांना एखादी व्यक्ती रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत आढळल्यास त्यांनी 9986809825 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ही संतोष दरेकर यांनी केले आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी ‘कोरडी होळी खेळावी आणि पाणी वाचवावे’ या विषयावर जनजागृती केली. सरकारी कन्नड प्राथमिक शाळा शाहूनगर येथे हा कार्यक्रम पार पडला. आधीच शहरात पाण्याची समस्या असून उन्हाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनी पाण्याचा वापर करू नये, कोरडे होळीचे रंग खेळावेत, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक एस.एस.वागूकर, शिक्षक एस. एस. हरेगपुरे, एस. व्ही. नवलगुंडे व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.