Friday, March 29, 2024

/

बेळगाव विमान तळाला पूर्वीचे दिवस येतील का?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : दिल्ली येथे सुरु असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी बेळगाव विमानतळाचा मुद्दा उपस्थित करून बेळगाव विमानतळाची व्यथा मांडली.

१९४२ साली रॉयल एअरफोर्सने स्थापन केलेल्या बेळगाव विमानतळावर २०१८ साली उडाण -३ योजना कार्यान्वित करण्यात आली होती. या योजने अंतर्गत १३ शहरांना जोडण्यासाठी ५ एअरलाईन कंपन्यांनी सेवा सुरु केली. या योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणात विमान वाहतूक सुरु होती.

याचप्रमाणे बेळगाव विमानतळाची प्रगती देखील जोरदार झाली. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, अहमदाबाद, चेन्नई, हैद्राबाद, इंदोर, नागपूर, नाशिक, उदयपूर, जोधपूर, तिरुपती, पुणे, हडप्पा, म्हैसूर आणि सुरत ला बेळगावशी जोडणारी विमानसेवा डिसेंबर २०२२ पर्यंत सुरळीत सुरु होती. उडाण – ३ योजना लागू होण्यापूर्वी बेळगाव विमानतळावरून प्रतिवर्षी ७४०४१ प्रवासी विमानप्रवास करत होते तर ११७६ विमानांचे उड्डाण होत होते.

 belgaum

उडाण-३ योजना लागू झाल्यानंतर विमानतावरून २०२१-२२ दरम्यान २८०००० प्रवाशांसहित ६४७० विमानांनी उड्डाणे केली आहेत. बेळगाव विमानतळावरील विमान वाहतूक लक्षात घेत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने २०२१ साली सर्वात व्यस्त विमानतळाच्या यादीत असलेल्या बेळगाव विमानतळाला उडाण अवॉर्ड चॅम्पियनशिप ने सन्मानित केले होते.

बेळगावमधील विमानतळाचा उडाण योजनेचा कालावधी हा ३ वर्षांचा आहे. यानुसार २०२३ साली हि योजना संपुष्टात येणार असून उडाण योजनेतून सहकार्य न मिळाल्याने ट्रूजेट, स्पेस जेट, अलायन्स या विमान कंपन्यांनी विविध ठिकाणच्या सेवा रद्द केल्या आहेत. परिणामी याचा फटका बेळगावकरांना बसत आहे. रद्द करण्यात आलेल्या विमानसेवेमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत आज राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आहे.

Iranna kadadi
राज्यसभा सदस्य इरान्ना कडाडी बेळगाव बेळगाव विमान तळाची मांडली व्यथा…

सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून राज्यातील तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बेळगाव विमानतळाला घरघर लागली असून याचे खापर बेळगावमधील जनता लोकप्रतिनिधींच्या माथी फोडत आहे. बेळगाव विमानतळावरील सेवा रद्द झाल्याने शेजारील हुबळी आणि कोल्हापूर विमानतळाला प्रवासी प्राधान्य देत आहेत. हुबळी विमानतळावर विमानफेऱ्या वाढविण्यासाठी बेळगाव विमानतळावरील सेवा रद्द केल्याचा आरोप भाजप नेत्यांवर करण्यात आला होता.

तसेच उडाण योजना कार्यान्वित असूनही नागरिकांना विमानसेवेचा लाभ घेता येत नसल्याने नागरिकातूनही नाराजी व्यक्त करण्यात येत होती. हीच बाब उचलून आज इराण्णा कडाडी यांनी राज्यसभेत मुद्दा उपस्थित केला आहे. केंद्रीय मंत्रालयात केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासमोर मांडलेली हि व्यथा बेळगाव विमानतळाच्या पथ्यावर पडेल का? ज्योतिरादित्य सिंधिया इराण्णा कडाडी यांच्या मुद्द्याची दखल घेतील का? बेळगाव विमानतळावरील सेवा पूर्ववत होतील का? आणि बेळगाव विमानतळाला पूर्वीचे दिवस येतील का? असे प्रश्न नागरीकातून उपस्थित होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.