Friday, April 19, 2024

/

बेकायदेशीर फलकांमुळे शहराचे विद्रूपीकरण

 belgaum

बेळगाव लाईव्ह : संपूर्ण राज्यभरात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या बॅनरबाजीला ऊत आला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून बेळगाव मधील रस्ते, चौक हे बॅनरबाजीमुळे झाकोळले गेले आहेत. याबाबत ‘बेळगाव लाईव्ह’वर अलीकडेच एक वृत्तही प्रकाशित करण्यात आले होते. विविध स्पर्धा, मेळावे, कार्यक्रम, राष्ट्रीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचा बेळगाव दौरा या सर्व पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून स्वागतासाठी फलक, तसेच विविध संस्थांचे, आस्थापनांचे जाहिरातींसाठी फलक लावण्यात येत आहेत.

शहर परिसरात फलक उभारण्यासाठी महानगरपालिकेची परवानगी आवश्यक आहे. मात्र, सध्या निवडणुकीचे वातावरण निर्माण झाल्याने शहर परिसरात बेकायदा फलक उभारण्यात येत असल्याचे निदर्शनात येत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून सातत्याने बेकायदेशीररित्या लावण्यात आलेले फलक हटवण्यात येतात. मात्र, पुन्हा दोन-चार दिवसात शहर परिसराला फलकांचा ‘बहर’ येत आहे!

बेळगाव आणि परिसर हा निसर्गरम्य भाग म्हणून पाहिला जातो. मात्र, बेळगावची निसर्गसंपदा राजकारण्यांच्या बॅनरमुळे झाकली जात आहे. शिवाय शहराच्या सौंदर्याचे विद्रूपीकरण होत आहे, अशी तक्रार सर्वसामान्यातून होत आहे. केवळ राजकारणीच नाही तर विविध शुभेच्छा फलक, शिक्षण संस्थांचे जाहिरातींचे फलक, यासह विविध प्रकारच्या फलकांचा सुकाळ बेळगाव मध्ये पहायला मिळत आहे. बेळगावमध्ये परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. व्यवसायासाठी, खरेदीसाठी तसेच बेळगाव मधील निसर्गरम्य परिसर न्याहाळण्यासाठी येणाऱ्या परराज्यातील नागरिकांना सध्या बेळगाव हे एखाद्या फलकाच्या कारखान्याप्रमाणे भासत आहे!

 belgaum

बेळगाव शहराच्या केएलइएस बायपास प्रवेशद्वारापासून बेळगाव मध्ये येणाऱ्या नागरिकांना हॉटेल रामदेव, नेहरू नगर परिसरापासून ते राणी चन्नम्मा चौकापर्यंत अनेक प्रकारचे फलक पाहायला मिळत आहेत. याचप्रमाणे चन्नम्मा चौकाच्या चोहोबाजूंनी असलेल्या परिसरात ठीक ठिकाणी पथदिपांवर झाडांवर भिंतीवर देखील फलकाचे साम्राज्य उभारलेले पाहायला मिळत आहे. याचप्रमाणे धर्मवीर संभाजी चौक ते आरपीडी पर्यंत चोहोबाजूंनी उंचच्या उंच फलक पाहायला मिळत आहेत. अनेक नेतेमंडळी, मान्यवर मंडळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलकही सध्या बेळगाव मध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. या सर्व गोष्टी पाहता बेळगावच्या सौंदर्याला धक्का पोहोचत असल्याची चर्चा सर्वसामान्यातून सुरू आहे. त्यामुळे बेळगाव आणि परिसरात ठीकठिकाणी उभारण्यात आलेले बेकायदेशीर फलक हटवण्यासाठी महापालिकेने विशेष कारवाई हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.