Wednesday, April 24, 2024

/

ग्रामीण मतदार संघासाठी समितीने लवकर रणनीती आखण्याची गरज

 belgaum

दादा, मामा, साहेबांनी विचार करावा पक्का! समिती उमेदवारावर लवकरात लवकर मारावा शिक्का!  बेळगाव लाईव्ह विशेष : विधानसभा निवडणूक ३-४ महिन्याच्या अवधीवर जरी असली तरी आतापासूनच या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्षांनी आतापासूनच कंबर कसली आहे. मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीने निवडणुकीची रणनीतीही आखली नाही, यामुळे सीमाभागात मराठी भाषिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी इतर राष्ट्रीय पक्षांप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीनेही रणनीती राबवावी अशी मागणी समितीच्या ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून होत आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघात एकीकडे राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार ठरलेले असताना महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत उमेदवार घोषित करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. उमेदवार ठरविण्यात आला, कि हि निवडणूक कशी जिंकता येईल, आणि या निवडणुकीसाठी कशापद्धतीने रणनीती आखता येईल, यादृष्टीकोनातून काम करणे सोपे जाईल.

ग्रामीण मतदार संघात काँग्रेसच्या वतीने विद्यमान आमदार पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार हे निश्चित आहे. मात्र भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी असून ३-४ इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मात्र या अनुषंगाने अद्याप समिती उमेद्वारासंदर्भात कोणतीही चर्चा ऐकण्यात आली नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीनेही ग्रामीण मतदार संघात ३-४ इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. परंतु तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने अधिकृतरीत्या चर्चा करून उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करणे आवश्यक आहे.

 belgaum

बेळगाव तालुका, ग्रामीण मतदार संघात एकूण ८३ गावे समाविष्ट आहेत. आगामी निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा झेंडा रोवायचे असेल तर या सर्व गावात जाऊन मतदारांशी संपर्क आणि समन्वय साधणे आवश्यक आहे. ८३ पैकी ६० गावात जाऊन तेथील मतदारांशी संपर्क साधण्यासाठी १५-२० दिवसांचा कालावधी अपुरा आहे. समितीची व्होटबँक वाढविण्यासाठी ऐनवेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे रणनीती ठरविण्यासाठी मुबलक वेळ मिळावा, मतदारांशी संपर्क साधण्यात यावा, या दृष्टिकोनातून आतापासून तयारीला लागणे आवश्यक आहे.

निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय पक्षांची तयारी पाहता मतदारांशी म्हणावा तितका संपर्क महाराष्ट्र एकीकरण समितीचा दिसून येत नाही. यासाठी जवळपास ८३ पैकी ६० गावांशी संपर्क साधायचा असेल कमीत कमी ६० ते ७० दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. यामुळे लवकरात लवकर उमेदवार घोषित केला पाहिजे, अशा प्रतिक्रिया सीमाभागात व्यक्त होत आहेत.Rural mes

आगामी विधानसभा निवडणूक मराठी आणि महाराष्ट्र एकीकरण समिती या दोन प्रमुख गोष्टी नजरेसमोर ठेवून जिंकायच्याच आहेत, यासाठी ग्रामीण भागातील मराठी मतदार प्रामाणिकपणे आगामी निवडणुकीत मतदान करणार हे निश्चित आहे. समितीचा उमेदवार कोण यापेक्षा समितीचा विजय हि बाब महत्वाची आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिक आतापासूनच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवार घोषणेची प्रतीक्षा करत आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधिंविरोधात सध्या ग्रामीण भागात जोरदार विरोधाचे सत्र सुरू आहे. याच प्रमाणे ग्रामीण भागात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीला बळकटी मिळाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचाच विजय निश्चित आहे, यात शंका नाही.

ग्रामीण मतदार संघाच्या तुलनेत शहर महाराष्ट्र एकीकरण समिती निष्क्रिय ठरली आहे. निवडणुका तोंडावर येऊनही अद्याप शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठका होत नाहीत किंवा निवडणुकी संदर्भात रणनीतीही आखण्यात आलेली नाही,असे चित्र आहे. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तुलनेत शहर महाराष्ट्र एकीकरण समिती काम करत नसल्याचेही निदर्शनात आले आहे, यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. शहर महाराष्ट्र एकीकरण समिती विस्कळीत आहे. शिवाय, समिती नेतृत्व देखील दिशाहीन आहे. यंदा ग्रामीण मतदार संघातून समितीचा उमेदवार निवडून येईल अशी आशा प्रत्येक मराठी भाषिकाला आहे. यामुळे समितीने वेळ वाया न घालवता लवकरात लवकर उमेदवार निवडीकडे कल वाढविण्याची गरज आहे.

अलीकडे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने रिंग रोड संदर्भात शेतकऱ्यांच्या बाजूने व्यापक मोहीम आखून तीव्र लढा दिला आहे. वेळोवेळी आंदोलने होत आहेत. त्यामुळे तालुक्यामध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती सक्रिय आहे. याव्यतिरिक्त महिला मेळाव्यांच्या माध्यमातून समितीचे बळकटीकरण होत आहे. याच माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण मतदार संघातील उमेदवाराची निवड लवकरात लवकर करून उमेदवाराचे नाव जाहीर करणे अत्यावश्यक आहे

बेळगाव मध्ये कॉलेज रोडवर असलेल्या हॉटेल पवन येथील तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात गेली तीन वर्षे म्हणावी तितकी कार्यकर्त्यांची रेलचेल नव्हती. मात्र, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने रिंग रोड संदर्भात हाती घेतलेल्या व्यापक मोहिमेनंतर या कार्यालयात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी वाढत आहे. तालुक्यातील अनेक गावांमधील शेकडो कार्यकर्ते समिती कार्यालयात दाखल होत आहेत. या सर्व सकारात्मक वातावरणाचा लाभ घेत तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने लवकरात लवकर उमेदवाराचे नाव घोषित करावे, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.