छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांचे व नवीन पिढीचे प्रेरणास्तोत्र आहेत. सर्व जातीजमातीचे लोक शिवाजी महाराजांचे मावळे होते.कष्टकरी, वारकरी, शेतकरी हे स्वराज्याचे पाईक होते. आजवर आपल्याला श्रीकृष्णाचे मामा कंस शिकवले, पण विषय गंभीर असताना खंबीर असणारे हंबीरराव मामा आपल्याला शिकवले गेले नाहीत. हंबीररावमामाचा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे, शिकून घेतला पाहिजे असे मत अभ्यासक शिवव्याख्याते प्रा.मधुकर पाटील यांनी व्यक्त केले.
बेळगाव तालुक्यातील होनगा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या अनावरण कार्यक्रमाप्रसंगी शिवचरित्रावर व्याख्यान देताना ते बोलत होते.,
पुतळे बांधले की जबाबदारी वाढते .डॉल्बी लावून पुतळ्या पुढे नाचणे ही आपले संस्कृती नाही. शिवरायांचा इतिहास तपासताना एक बाब लक्षात येते की, शिवरायांनी कसं जगावं हे आपल्याला शिकवलं ,आणि संभाजीराजांनी कसे लढावे हे शिकवलं .ह्या दोन महापुरुषांच्या जीवनचरित्रातून आपण हे शिकले पाहिजे की प्रसंगावधानी कसे झालं पाहिजे.
शाहिस्तेखानाचं बोट आणि अफजलखानाचा पोट या पलीकडे खूप मोठा इतिहास आहे. तो शिवरायांचा इतिहास आपण समजावून घेतला पाहिजे, आणि स्वाभिमानाचं स्वराज्य निर्माण केलं पाहिजे ,असेही पाटील म्हणाले.
अहत तंजावर तहत पेशावर स्वराज्य निर्माण करायचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांचे होतं ते स्वप्न पुढे मराठ्यांनी पूर्ण केलं. अख्ख्या हिंदुस्तानवर मराठ्यांचे राज्य निर्माण झालं हा इतिहास आपण आपल्या पुढच्या पिढीला समजावून सांगितला पाहिजे. शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरु होते ,देशांतर आणि वेशांतर कसे करावे हे महाराजांनी आपल्या कृतीतून शिकवले आहे. तहात गेलेले किल्ले परत मिळवता येतात आणि स्वराज्यही उभ करता येतं हे शिवाजी महाराजांनी शिकवलं असेही ते म्हणाले.
सुरतवर हल्ला करून राज्याचा विस्तार वाढवण्याची कृती शिवाजी महाराजांनी केली होती. 21 व्या पिढीला गनिमी काव्याने कसे जगायचे ,कसे वागायचं, कसं शिकायचं, कसे लढायचे हे शिवाजी महाराजांनी शिकवलं. प्रेयसीसाठी ताजमहाल बांधणाऱ्या शहाजानचा इतिहास आपल्याला शिकायचा नसून आईसाठी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला शिकायचा आहे हे प्रत्येक तरुणांना लक्षात ठेवले पाहिजे असे मधुकर पाटलांनी आपल्या भाषणात विषद केले.
कार्यक्रमाप्रसंगी आमदार सतीश जारकिहोळी,अंजली निंबाळकर आदींची भाषणे झाली. भगवामय वातावरणात छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे अनावरण कार्यक्रम पार पडला यावेळी हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी होनगा गावात उपस्थित होते.