गेल्या २५ दिवसांपासून बेळगावमधील गोल्ड कोर्स मैदान परिसरात दडलेला बिबट्या सर्वांच्याच नाकीनऊ आणत आहे. वनविभाग आपल्या मोठ्या ताफ्यासह बिबट्याचा शोध घेण्यात व्यस्त आहे. मात्र बिबट्याच्या दहशतीची धास्ती घेऊन गेल्या २५ दिवसांपासून गोल्फ कोर्स मैदान परिसरात येणाऱ्या २२ शाळेतील विद्यार्थ्यांचे मात्र भवितव्य टांगणीला लागले आहे. खबरदारीच्या उपायासाठी या शाळांना धरपकड वृत्तीने गेल्या २५ दिवसातील १८ ते २० दिवस सुट्टी देण्यात आली असून आधीच कोविड काळात नुकसान झेलाव्या लागलेल्या या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर बिबट्याने पुन्हा पाणी फेरले आहे.
काही शाळा ऑनलाईन क्लासचा पर्याय निवडून वर्ग भरवत आहे. तर काही शाळा पुन्हा पूर्ववत सुरु करण्याचा विचार करत आहेत. या साऱ्या धुमाकुळात सुमारे १०००० विद्यार्थी आणि त्यांचे पालक विवंचनेत आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी काही शाळा सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र या शाळांनी आता पालकांसमोर काही पर्याय ठेवले आहेत. शाळा व्यवस्थापन कमिटी शाळा सुरु करून वर्ग भरविण्यासाठी तयार आहेत. मात्र शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांना पालकांचे ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ म्हणजेच ‘ना हरकत पत्र’ घेऊन यावे लागणार आहे.
या परिसरात अजूनही बिबट्याची दहशत कायम असून आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यासाठी आमची काहीच हरकत नसून कोणत्याही अनुचित घटनेची जबाबदारी शाळा व्यवस्थापन घेणार नाही, याची जबाबदारी पालकांचीच राहील अशा आशयाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत येता येणार आहे.
या साऱ्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मात्र टांगणीला लागला आहे. एकीकडे धोक्यात आलेल्या प्रजातींना वाचविण्यासाठी वनविभाग करत असलेली धडपड, दुसरीकडे बिबट्या वरून बेळगाव शहरातील प्रशासकीय व्यवस्थेला लागलेली चिंता, या भागातील नागरिकांमध्ये बिबट्यामुळे निर्माण झालेली दहशत, बिबट्या शोध मोहिमेसाठी झेलावा लागणार अवाढव्य खर्च, विरोधकांकडून होत असलेली टीका, सोशल साईटवर पसरणाऱ्या अफवा आणि यामध्ये भरडला जाणारा विद्यार्थी हि बाब मात्र खरंच अनाकलनीय दिशेने वाटचाल करीत आहे.
बिबट्याला जिवंत पकडण्यासाठी वनविभागाची सुरु असलेली धडपड हि प्रशंसनीय आहे मात्र यासाठी देखील सुजाण नागरिकांनी, राजकारण्यांनी थोडे सहकार्य देणे महत्वाचे आहे.