Friday, March 29, 2024

/

हुळंद हे गाव हटवण्याचा मुद्दा ऐरणीवर!

 belgaum

खानापूर तालुक्यातील कणकुंबी अरण्यक्षेत्रात येणारे हुळंद हे गाव हटवण्याचे कारस्थान वनखात्याकडून करण्यात येत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आम्हाला हटविण्यास आम्ही का नक्षलवादी आहोत का? असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला आहे. तसेच वनखात्याच्या कारस्थानाला विरोध जोरदार आवाज उठवून तीव्र आंदोलनाचा इशारा एका निवेदनाद्वारे जिल्हा वनाधिकाऱ्यांना देण्यात आल्यामुळे हे प्रकरण ऐरणीवर आले आहे.

जांबोटीं महसूल क्षेत्रातील कणकुंबी अरण्य क्षेत्रात सर्व्हे नं. 19 मध्ये 25 घरे असलेले हुळंद गाव 1951 पासून अस्तित्वात आहे. या ठिकाणी सध्या शासनाची अंगणवाडी, प्राथमिक शाळा, रस्ते तसेच सर्व नागरी सुविधा आहेत. गेल्या 70 वर्षापासून हे गाव येथे वसलेले असताना अचानक पणे गाव हटवण्याचा प्रयत्न होत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण आहे.

 belgaum

वनखात्याने गावातील काहींना नोटीस बजावून लवकरात लवकर गाव खाली करण्यात यावे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे. त्यामुळे मुळातच अल्पशिक्षित असणाऱ्या इथल्या नागरिकांची झोप उडाली आहे.

सत्तर वर्षापासून वास्तव्य असणाऱ्या आम्हा ग्रामस्थांना आमच्या घरांसह उठविण्याचे कारस्थान जुलमी शासनाने आखले आहे. आम्हाला भीती दाखऊन, कायदेशीर कागदपत्रांचे धमकी देऊन आम्हास हाकलून लावण्यास आम्ही नक्षलवादी आहोत का? असा सवाल हुळंदवासीयातून उपस्थित केला जात आहे. वनक्षेत्रावर अतिक्रमण केल्याचा खोटा ठपका ठेवत नागरिकांना वेठीला धरण्याचा प्रकार चालवल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होतो आहे.Hulund

गेल्या वर्षभरापूर्वी भिमगड अभयारण्यातील गवाळी, हेम्मडगा, देगाव मेंढील, कोंगळा आदी गावे स्थलांतरित करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू होते. यासाठी तिथल्या नागरिकांवर दबाव टाकण्याचा वनाधिकार्‍यांकरवी प्रयत्न झाला. मात्र नागरिकांनी वेळोवेळी शासनाला कडाडून विरोध केल्याने सध्यातरी शासनाचे प्रयत्न थांबलेले आहेत. मात्र ग्रामस्थांना भेडसावू इथली लोकवस्ती संपवण्याचा प्रयत्न सुरूच असतो. हुळद गावच्या बाबतीत सध्याचा घडलेला प्रकार हा त्याचाच एक भाग आहे.

दरम्यान, वनखाते आमच्या जीवावर उठले असून आमचे अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न होत आहे. आमची नाळ इथल्या जमिनीशी जोडलेली आहे. इथली झाडे आणि इथला निसर्ग यांच्याशी आम्ही एकरूप झालेलो आहोत. आम्ही कष्टाने भिंती उभारून संसार थाटले आहेत. आम्ही गरीब असू पण आम्ही स्वाभिमानी आहे. वनखात्याची मुगलाई आम्ही सहन करणार नाही. आम्ही आमचे गाव वाचविण्यासाठी कोणत्याही ही समस्येचा सामना करण्यास समर्थ आहोत असे सांगून प्रसंगी आम्ही तीव्र लढा उभारू, असा इशारा हुळंदवासियांनी दिला आहे. तसेच हुळंद गाव हटवण्याच्या कारस्थाना विरोधात माजी ता. पं. सदस्य धनश्री सरदेसाई जांबोटकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा वन अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

तसेच हुळंदवासियांनी न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी वन खात्याच्या विरोधात उग्र आंदोलन हाती घेऊ, असा इशाराही धनश्री सरदेसाई -जांबोटकर यांनी दिल्यामुळे हे प्रकरण सध्या ऐरणीवर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.