Saturday, April 27, 2024

/

डिजिटल शवविच्छेदन तंत्र ही काळाची गरज : तज्ञांचे मत

 belgaum

फॉरेन्सिक मेडिसिन अर्थात न्यायवैद्यक औषधांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव आणि मृतांचे डिजिटल शवविच्छेदन आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून आणू शकतील, असे मत बेळगावच्या न्यायवैद्यक औषध तज्ञांनी व्यक्त केले आहे.

बेळगावचे न्यायवैद्यक औषध तज्ञ (फॉरेन्सिक मेडिसिन एक्सपर्ट) डॉ. विनय हळ्ळीकेरी म्हणाले की, पाश्चात्य जग आधुनिक तंत्रज्ञानाचा शवविच्छेदन क्षेत्रात वापर करून बरेच पुढारलेले असताना भारतातील वैद्यकीय व्यवस्था मात्र मृताच्या शरीराची चिरफाड (डोके, छातीचा भाग आणि उदर) करण्याच्या जुन्या पारंपारिक तंत्राचा वापर करण्यामध्ये गुंतून पडली आहे. ही प्रक्रिया परिश्रमपूर्वक केली जात असली तरी या चिरफाड करण्याच्या पारंपारिक तंत्रात मानवतेचा अभाव असतो आणि यामुळे मृताच्या कुटुंबीयांच्या मनाला जबरदस्त आघात पोचू शकतो. याखेरीज या तंत्रामध्ये वस्तुनिष्ठतेचा अभाव असतो आणि ते सहजासहजी न्यायालयासमोर पुनश्च करून दाखवता येत नाही. तसेच फार काळ सांभाळूनही ठेवता येत नाही. याव्यतिरिक्त या पारंपारिक शवविच्छेदन प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या आरोग्य व्यवसायिकांना एचआयव्ही, व्हायरल हेपेटाइटिस आदी संसर्गजन्य रोगांसह सध्याच्या कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतो.

तेंव्हा काळाची गरज लक्षात घेऊन भारतीय न्यायवैद्यक व्यवस्थेने आधुनिक तंत्रज्ञांचा स्वीकार करून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यासाठी वर्च्युअल किंवा डिजिटल शवविच्छेदनाचाचे तंत्र वापरले गेले पाहिजे ज्यामुळे आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून येतील, असे डॉ. विनय हळ्ळीकेरी यांनी स्पष्ट केले.

 belgaum

डॉ. विनय हळ्ळीकेरी यांनी बेळगावच्या केएलई विद्यापीठातून एमडी इन फॉरेन्सिक मेडिसीन ही पदवी संपादन केली आहे. सध्या ते कडोली येथील ग्रामीण जनतेची प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा करत आहेत. त्यांना इंग्लंड, मलेशिया, मॉरिशियस, इथोपिया आदी देशांमधील आंतरराष्ट्रीय कामाचा अनुभव आहे. डिजिटल शवविच्छेदनाचे प्रशिक्षण घेतलेल्या जगातील कांही मोजक्या लोकांपैकी डॉ विनय हळ्ळीकेरी हे एक आहेत. डिजिटल शवविच्छेदन सर्जन असणाऱ्या डॉ. हळ्ळीकेरी यांनी आतापर्यंत शेकडो गुन्ह्यांचा तपास लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

महत्वाकांशी ‘डिजिटल इंडिया’ चे जे पाऊल उचलण्यात आले आहे, त्यामध्ये शवविच्छेदन तपासाच्या प्रगत तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला जावा, अशी विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे करणार आहोत असे डॉ. विनय हळ्ळीकेरी यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.