रेल्वे स्थानक आवार आणि रेल्वेमध्ये फेसमास्क सक्तीचा करण्यात आला असून फेसमास्क न वापरणाऱ्यांना रेल्वे कायद्याअंतर्गत 500 रुपये दंड आकारण्याचा आदेश आज शनिवारी जारी करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय रेल्वे खात्याने ही दंडाची उपाय योजना केली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी असलेल्या मार्गदर्शक सूचीमध्ये तोंडाला मास्क लावणे ही एक महत्वाची विशिष्ट सूचना आहे. भारतीय रेल्वेने गेल्या 11 मे 2020 रोजी रेल्वे वाहतुकीसंदर्भात मानक कार्यप्रणाली म्हणजे एसओपी लागू केला होता. त्यामध्ये प्रवाशांनी रेल्वे स्थानकात प्रवेश करताना आणि रेल्वे प्रवास करताना फेसमास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला होता. हा नियम आता सक्त करण्यात आला असून भारतीय रेल्वेच्या नियम 2012 नुसार मास्क न वापरल्यास दंड आकारला जाणार आहे.
कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती पाहता रेल्वेस्थानक आवारात थुंकणे वगैरे प्रकार करणे अथवा रेल्वेमध्ये फेसमास्क न वापरणे, यामुळे गलिच्छता आणि अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होऊ शकते. ज्यामुळे जनतेच्या जीवाला किंवा आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे थुंकने वगैरे प्रकार रोखण्यासाठी फेसमास्क हा उत्तम उपाय आहे, ज्यामुळे तोंड झाकलेले राहते. यासाठी रेल्वे स्थानक आवारात अथवा रेल्वेमध्ये फेसमास्क न वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारला जावा असा आदेश देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पुढील आदेश येईपर्यंत येत्या 6 महिन्यासाठी या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी केली जावी असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, देशात एका दिवसामध्ये विक्रमी 2,34,692 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून एका दिवसातील मृतांची संख्या 1,341 इतकी आहे. यामुळे देशातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,45,26,609 इतकी वाढली असून मृतांची संख्या 1,75,649 इतकी झाली असल्याची माहिती शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.