राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वत्थ नारायण यांनी यलहंका हवाई दल विमानतळ बेंगलोर येथे शुक्रवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन आयटी क्षेत्र अर्थात माहिती -तंत्रज्ञान क्षेत्र वाढविण्यासाठी बेळगाव येथील जमिनीची मागणी केली आहे.
यलहंका हवाई अड्ड्यावरील सदर भेटीप्रसंगी आपल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची व्याप्ती बेंगलोर बाहेर देखील वाढविण्याचा कर्नाटक सरकारचा दृष्टिकोन आणि त्यासाठी बेळगाव येथे आयटी पार्क अर्थात माहिती तंत्रज्ञान केंद्र उभारण्याची योजना याबाबतची माहिती उच्च शिक्षणमंत्री डॉ अश्वत नारायण यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना दिली.
तसेच बेळगाव येथील महसूल खात्याची 750 एकर जमीन जी सध्या संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे ती सरकारला हस्तांतरित करावी, अशी विनंती देखील केली आहे.
दरम्यान, असे समजते की, बेळगावच्या एका आमदारांनी आयटी पार्क संदर्भातील खाजगी सदस्यांचा मसुदा सादर केला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी पूना -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाशेजारील कणबर्गी गावानजीकची सर्व्हे क्र. 1314 ते 1349 पर्यंतची 745 एकर खुली जमीन नियोजित आयटी पार्कसाठी सुचविली आहे.
पूर्वी बेळगाव सुवर्ण विधानसौधसाठी लष्कराची ही जागा निश्चित करण्यात आली होती. परंतु कांही कारणास्तव सुवर्ण विधानसौध हालगा येथे उभारणी करण्यात आली. थोडक्यात आयटी पार्कसाठी बेळगावातील लष्कराची 750 एकर जमीन सरकारकडे हस्तांतरित करावी, अशी विनंती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे करण्यात आली आहे. जर ही विनंती मान्य झाली तर लवकरच आयटी पार्क उभारणीच्या हालचालींना प्रारंभ होणार आहे.