Thursday, April 25, 2024

/

‘सांस्कृतिक ठेवा जपा…पण जरा जपूनच’

 belgaum

नवरात्रात दुर्गामाता मूर्ती प्रतिष्ठापना करण्याची परंपरा बंगाली जनतेची असली तरी गेल्या दोन वर्षांपासून बेळगावात दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे.अनेक मंडळे यात सहभागी झाल्यामुळे त्यातही सजावट,जल्लोशी मिरवणूक,फटाक्यांची आतषबाजी,डॉल्बीचा दणदणाट, शेवटी विसर्जन आमच्या मंडळाचे अशी स्पर्धा वाढीस लागली आहे .मंगळवारी रात्री सुरू झालेली मिरवणूक बुधवारी सकाळी आठ वाजता शेवटच्या मूर्तीचे विसर्जन जक्कीनहोंड तलावात करण्यात आले.त्यामुळे गणपती विसर्जन मिरावणुकीचीच पुनरावृत्ती या मिरवणुकीत झाली आहे.

दोन मंडळे जक्कीनहोंड तलावावर पोचली.तेथे त्यांच्यात शेवटी विसर्जन कोण करणार यावरून शाब्दिक चकमक झडली आणि वातावरण तंग झाले.शेवटी उपस्थित पोलीस अधिकाऱ्याने सौम्य लाठीहल्ला केला आणि परिस्थिती आटोक्यात आणली.या तंग वातावरणात पोलिसाने एक कार्यकर्त्याचा मोबाईल विसर्जित केला .या घटने नंतर उशीरा चाललेली मिरवणूक आणि डॉल्बी वर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे त्यावर वाचा बेळगाव Live विशेष

अधीर झालुया
बधीर झालुया
तुझ्याचसाठी बनुन मजनू
मागं आलुया…..
दणदणा डॉल्बीवर वाजणारे हे गाणं .दोन बेस चार टॉप, डॉल्बी घुमाट वाजणारी तिच्या दणदणाटाने छातीचे वाढणारे ठोके आणि कानाच्या पडद्यावर नाचणारी टिपरी.. माहोल बेधुंद… बेफाम.. त्यावर बेछूट झालेली तरुणाई नाचणारी, पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसा पर्यंत कल्लोळ पिऊन झिंगाट झालेला नवयुवक, घामाघूम होऊन नाचत असलेला..हे चित्र आतां नवीन राहिलेलं नाही. लग्न असो वा सण असो किंवा कोणता समारंभ असो हे चित्र नित्याचे झालेलं आहे.

 belgaum

गणपती उत्सवा नंतर आता दुर्गाष्टमीचे प्रस्थही शहराबरोबरच खेडोपाडीही झपाट्याने पसरत चाललेले आहे.
आवाज वाढव डी जे ..
तुला आईची शपथ हाय.
हा शपथेचा मामला आता अरेरावीवर येऊन पोचला आहे कुणी डॉल्बीला विरोध केला त्याचा आवाज डॉल्बीच्या आवाजात दाबून टाकला जात आहे.Durgapoojaदुर्गादेवीची रात्रभर चाललेली विसर्जनाची मिरवणूक सांस्कृतिक दर्शन करणारी असते. भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. देशभरात प्रादेशिक असणारे सार्वजनिक उत्सव, आपल्या कक्षा रुंदावत अन्य राज्यातही होऊ लागले आहेत. त्यातूनच गुजरात येथील गरबा, बंगाल येथील दुर्गापूजा आपल्या कडे पोहोचल्या. पुढे पंजाबी लोकांचा बैसाखीही आपल्या कडे पोहोचेल,पोंगल ओनमही येतील बिहार मधील छटपूजा तर मुंबईत पर्यंत आलेलीच आहे विस्थापनानें माणूस सर्वत्र पोहोचला आहे. आपल्या परंपरा जपणे त्याला अगत्याचे व गरजेचे वाटू लागले आहे त्यात गैर काही नाही पण त्याच्या आडून येणाऱ्या बिभस्त प्रथा ही चिंतनीय बाब होऊन बसल्या आहेत.

रात्रभर चालणाऱ्या शोभायात्रेतुन ध्वनी प्रदूषणा बरोबर सामाजिक स्वास्थ्य देखील बिघडत चालले आहे. व्यसनाधीनतेचा अतिरेक रात्रभरची जागरणे,खोट्या मानापनासाठी केलेले वाद विवाद,पोलिसांच्या हतबलतेतुन येणारी अरेरावी यातून उत्सवाचा बिघडणारा माहोल.सगळंच सुन्न करणारं, बारमाही उत्सवाने युवकांना आपल्या प्रगतीकडे पहाण्यासाठी वेळच उरला नाही अश्या उत्सवात होणाऱ्या मारामारी, वादविवादा सारख्या अप्रिय घटनांमुळे पोलिसां कडून केलेली कारवाई युवकांचे भविष्य अंधकारमय करू शकते.आर्थिक मंदीच्या या काळात तरुणाई अश्या गोष्टीत मशगुल रहाते याचा पालकांनाही मनस्ताप होत आहे.

सांस्कृतिक ठेवा जपताना आपलं भविष्यही जपलं पाहिजे, ही जाणीव तरुणाईत जागरूक करणे आता काळाची गरज बनली आहे.नाहीतर…
चांदी के डालपर
सोने का मोर…
ताकझाक करे
नीचे का चोर …
असं म्हणत युवकांना दुसऱ्याची प्रगती बघून, आपल्या कपाळावर हताशपणे हात मारत बसण्याची वेळ येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.