कर्नाटक बंदचा बेळगावात फज्जा
कावेरी आणि कळसा भांडूरा पाणी प्रश्नासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी,अशी मागणी करून कन्नड संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदला बेळगाव शहरात अल्प प्रतिसाद लाभला आहे.
दैनंदिन व्यवहार, व्यापार उद्योग, शाळा, कॉलेज यांच्यासह कामकाज सुरळीत सुरू झाले आहे. जिल्ह्यातील शाळा बंद ठेवल्या जाणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी स्पष्ट केली आहे. त्यामुळे शासकीय कार्यालये आणि शाळा कॉलेज सुरळीत आणि नियोजित वेळेत सुरू झाली.वाहतूकही सुरळीत सुरू होती.बससेवा,रिक्षा,खासगी वाहतूकही सकाळी सुरू होती. त्यामुळे बंदला बेळगाव शहरात प्रतिसाद मिळाला नाही.
सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या घेऊन बंदची हाक देणार्या कानडी संघटनांच्या बंदला राज्यातील बहुतांश संघटनांनी विरोध दर्शविलाअसल्याने सोमवार चा बेळगाव बंद फुसका बार ठरला आहे.
काही दिवसांपूर्वी कन्नड चळवळीचे नेते वाटाळ नागराज यांनी बेळगावात धाव घेऊन मूठभर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात गरळ ओकली होती. ‘कर्नाटक सरकारने म. ए. समितीवर बंदी घालावी’ या मागणीसाठी त्यांनी कर्नाटक बंद करण्याची वल्गना केली होती. परंतु, या मागणीला प्रतिसाद मिळू शकला नाही. यामुळे त्यांची अवस्था बिकट झाली आहे. सोमवारचा कर्नाटक बंद हा राज्यातील पाणी समस्यासह अन्य 12 मागण्या घेऊन पुकारण्यात आला आहे. यामध्ये शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. मात्र कानडी संघटनांनी बेळगावातील कानडी संघटनांना खुष करण्याचा खटाटोप करत त्यामध्ये मराठी द्वेषाची झालर लावण्याचा प्रयत्न केला. परंतु हा खटाटोप त्यांच्या अंगलट आला असून सोमवार चा बेळगाव बंद हा फ्लॉप शो ठरला आहे.
कानडी संघटनांत फूट
कर्नाटक रक्षण वेदिकेच्या नारायण गौडा गटानेदेखील बंद पासून लांब रहाणे पसंद केले आहे. त्याचबरोबर पविहन मंडळ, रिक्षा, टॅक्सी, रेल्वे, हॉटेल, पेट्रोल पंपधारक संघटनेने बंदमध्ये सहभागी होण्यास नकार दर्शविला होता. बंदच्या घोषणेवरून कानडी संघटनामध्ये फूट पडल्यामुळे बंद यशस्वी करण्यासाठी शेतकरी संघटनांची मदत घेतली आहे. बेळगाव व्यतिरिक्त इतर ठिकाणी बंद ला प्रतिसाद मिळाला मात्र बेळगावात बंद चा फज्जा उडाला आहे.