बेळगावच्या शिवजयंतीच्या उत्साही पर्वाला सुरुवात झाली आहे.उद्या या पर्वातला महत्वाचा दिवस म्हणजे चित्ररथ मिरवणूकीचा. ही मिरवणूक पूर्णपणे पारंपरिक वाद्यांच्या तालावर व्हायला हवी, तिला डॉल्बीचे ग्रहण नको याचा सर्वच शिवभक्तांनी विचार करायची गरज आहे.
शिवराय आणि त्यांचा जीवन काळ म्हणजे आमची मराठी परंपराच जणू. ही परंपरा होती पारंपरिक वाद्यांची, ढोल, ताशे, लेझीमीची. दांडपट्टे आणि करेल्याची. शरीरसौष्ठवची आणि जयघोषाची. ती जशीच्या तशी दर्शविणे हे आपले कर्तव्य. आधुनिकता जोपासायला हवीच मात्र इतिहास दाखवताना आधुनिकतेच्या नावाखाली धिंगाणा होऊ नये याचे भानही आम्हीच बाळगायला हवे.
डॉल्बी हे तसे जीवघेणे वाद्य बनले आहे. हृदयरूग्ण आणि वृद्धांना त्याचा त्रास होतो. लहानग्यांना तर ते घातकच. यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली आहे. डॉल्बी म्युजिक शैलीच्या वापरातून आपण चित्ररथातील संवाद मांडायला हरकत नाही. मात्र बास वाढवून कर्णकर्कश आवाज आणि धुमधूम घातक ठरते याची जाणीव पाहिजेच.
या प्रकाराने अनेकांचे जीव धोक्यात येणार असतील तर हा अट्टाहास आम्ही थांबवूया.
उद्याची शिवजयंतीची चित्ररथ मिरवणूक शांती, संयमाने आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर व्हावी हीच अपेक्षा.