बेळगाव लाईव्ह :श्री मलप्रभा सहकारी साखर कारखान्यातील कथित आर्थिक गैरव्यवहारांची न्यायालयीन चौकशी करून चौकशी अहवाल तात्काळ जाहीर करावा, अशी जोरदार मागणी भारतीय कृषक समाजाने केली आहे.
एम. के. हुबळी येथील श्री मलप्रभा सहकारी साखर कारखान्यात झालेल्या गैरव्यवहार आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत कलम ६४ अन्वये चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर २९ जून २०२४ रोजी अपीलीय याचिका रद्द करण्यात आली.
वाणिज्य व उद्योग विभागाकडून निवृत्त न्यायाधीश एस. सी. इनगळी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या चौकशीचा अहवाल दडपण्यात आल्याचा गंभीर आरोप भारतीय कृषक समाजाचे प्रदेशाध्यक्ष सिदगौडा मोदगी यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

आमदार तसेच कारखान्याचे अध्यक्ष चन्नराज हट्टीहोळी यांनी निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. चौकशी अहवाल सार्वजनिक करून कारखान्याचे भागधारक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.
२०२५-२६ च्या गळीत हंगामात कारखान्याने केवळ २,३३,११६ मेट्रिक टन ऊस गाळप केला असून, इतर कारखान्यांच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत कमी आहे. कारखान्याचे नुकसान भरून काढण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासावे, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.





