बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली गेली आहे. १६ सप्टेंबर रोजी सुनावणी निश्चित असतानाही खंडपीठासमोर असलेल्या इतर महत्त्वाच्या खटल्यांमुळे सीमाप्रश्नाचा दावा आज सुनावणीला येऊ शकला नाही.
यापूर्वी ९ सप्टेंबर रोजीही सीमाप्रश्नाची सुनावणी होणार होती. मात्र, सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर प्रकरणांची संख्या अधिक असल्याने त्या दिवशीही दावा पुकारला गेला नव्हता.
यानंतर महाराष्ट्राचे ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजी जाधव यांनी १० सप्टेंबर रोजी पुन्हा दावा मेन्शन केला. त्यानुसार १६ सप्टेंबरची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, आजही सुनावणी होऊ शकली नाही.
आता सीमाप्रश्नाच्या पुढील सुनावणीसाठी नव्या तारखेची प्रतीक्षा आहे. लवकरच पुढील तारीख निश्चित होईल, अशी माहिती ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांनी दिली.
९ सप्टेंबरपासून सुरू असलेली सुनावणीची प्रतीक्षा आता पुढील तारखेवर येऊन ठेपली आहे.





