बेळगाव लाईव्ह विशेष : ‘स्वच्छ बेळगाव, सुंदर बेळगाव’ या संकल्पनेअंतर्गत कचरा विल्हेवाट व प्लास्टिक बंदीसारख्या धडक मोहिमा राबवल्या जातात. मात्र, बेळगावकरांच्या थेट आरोग्याशी निगडित असलेल्या ‘अन्नपदार्थांच्या’ गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत आहे. शहरात खाद्यपदार्थांच्या दुकानांचा महापूर आला असला तरी देखरेख ठेवणारी यंत्रणा सुस्तावली आहे. महाराष्ट्रात आयएएस तुकाराम मुंडे ज्याप्रमाणे धडक कारवाया करून प्रशासनाला वठणीवर आणतात, तसा कडक इरादा बेळगावात कधी दिसणार, असा सवाल सुजाण नागरिक विचारत आहेत.
खवय्यांची पसंती अन् व्यावसायिकांची चांदी
बेळगावकर हे उपजतच खवय्ये आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागापासून महामार्गांपर्यंत चौहोबाजूंना स्नॅक्स, फास्ट फूड आणि रेडिमेट मिठाई विकणारे स्टॉल्स व हॉटेल्स उघडली आहेत. खवय्यांच्या प्रतिसादामुळे व्यावसायिकांची चांदी होत असली तरी या चवदार आमिषामागे आरोग्याच्या सुरक्षेचे काय, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
आरोग्याशी खेळणारे तांत्रिक व स्वच्छता विषयक मुद्दे
केवळ अन्न विकणे पुरेसे नसून स्वच्छतेचे निकष पाळणे बंधनकारक असते. दुर्दैवाने बेळगावात महागाईमुळे एकाच तेलाचा वारंवार घातक पुनरुपयोग (Re-used Cooking Oil) केला जातोय, ज्यामुळे कॅन्सर व हृदयविकाराचा धोका वाढतो. याशिवाय अन्न आकर्षक दिसण्यासाठी अमानक रसायने व स्वस्त फूड कलर्सचा वापर, अस्वच्छ पाण्याचा वापर आणि उघड्यावरील खाद्यपदार्थांवर बसणारी धूळ-माशा यांमुळे थेट नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.
महागाईचा फटका अन् गुणवत्तेशी तडजोड
खाद्यतेल व गॅसच्या किमती वाढल्याने हॉटेल्स व स्टॉल्सचालकांनी दर वाढवले आहेत. मात्र, वाढत्या खर्चाचा मेळ घालण्यासाठी अन्नाची प्रत आणि स्वच्छता यांच्याशी उघडपणे तडजोड केली जात आहे. दर वाढवूनही ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे अन्न देणे हा नागरिकांच्या खिशावर आणि आरोग्यावर मारलेला दरोडाच आहे.
‘एफएसएसएआय’ व पालिकेचे मौन आणि पडताळणीचा अभाव
अन्न तपासणी आणि परवाने देण्याची जबाबदारी FSSAI आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची असते. मात्र, शहरात स्टॉलधारकांकडे वैध परवाने आहेत का, याची तपासणी होत नाही. कारखान्यांमध्ये स्वच्छता तपासली जात नाही व मोबाईल लॅब गाड्याही रस्त्यावर दिसत नाहीत. FSSAI चे प्रमाणपत्र ऑनलाईन मिळवणे सोपे झाले असले तरी, परवाना दिल्यानंतर अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पडताळणी (Post-licensing Inspection) करत नाहीत. नियमित ऑडिटअभावी कागदावर नियम पाळणारे व्यावसायिक प्रत्यक्षात स्वच्छतेची धिंडवडे उडवत आहेत.

सुजाण नागरिक विरुद्ध अज्ञानी जनता
सोशल मीडियामुळे सुजाण नागरिक खाण्यापिण्याबाबत जागरूक होत असले तरी, मोठा वर्ग अजूनही अज्ञानी आहे. बाहेर मिळणारे अन्न कसे बनवले जाते याची त्यांना कल्पना नसते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही व्यावसायिक, अन्न सुरक्षा विभाग व प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे.
उपाययोजना व निष्कर्ष
परिस्थिती सुधारण्यासाठी हॉटेल्स व स्टॉल्सवर नियमित अचानक धाडी टाकणे, ‘फूड सेफ्टी रेटिंग’ बोर्ड बंधनकारक करणे, तक्रारींसाठी व्हॉट्सअॅप हेल्पलाइन सुरू करणे आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी सक्तीची करणे गरजेचे आहे. कचरामुक्त बेळगावसोबतच ‘भेसळमुक्त व स्वच्छ बेळगाव’ असणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ कागदी नोटिसांनी हा प्रश्न सुटणार नाही. तुकाराम मुंडे यांच्यासारखा कडक बाणा दाखवत अधिकाऱ्यांनी एसी केबिनमधून बाहेर पडून रस्त्यावरील स्टॉल्सपासून अलिशान हॉटेल्सपर्यंत धडक कारवाया केल्या, तरच बेळगावकरांचे आरोग्य सुरक्षित राहील.





